महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून सुरु असलेला निवडणूक प्रचार आज थंडावला. आम आदमी पक्षाशी निकालानंतर ‘हातमिळवणी’ करण्यास अनुकूलता दर्शवणाऱ्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे काँग्रेसमध्ये असलेले चिंतेचे वातावरण अधोरेखित झाले. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली व लोकसभेतीले विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, ‘आम आदमी पक्षाला दिलेले मत वाया जाणार’, असे सांगत भाजपला वाटणारी धास्ती बोलून दाखवली. त्यामुळे एरव्ही परस्परांवर चिखलफेक करणाऱ्या काँग्रेस-भाजपने प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आम आदमी पक्षाकडे आपला मोर्चा वळवला. दिल्लीत ४ डिसेंबरला मतदान होणार आहे.
    शीला दीक्षित, खा. संदीप दीक्षित, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन, प्रदेशाध्यक्ष विजय गोयल आदी नेत्यांनी शेवटच्या दिवशी प्रचारात स्वतला झोकून दिले. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची दखल दस्तूरखुद्द नरेंद्र मोदी यांनी घेतली. ‘केजरीवाल अण्णांचे नाही झाले तर तुमचे (दिल्लीकरांचे) काय होणार’, अशी टिका मोदी यांनी केली होती. केजरीवाल यांनी मात्र मोदींवर वैैयक्तिक टिका न करण्याचा शहाणपणा दाखवला. पटेल नगरसारख्या उच्चमध्यमवर्गीय व मोलमजूरी करणाऱ्या वर्गाची समान मते असणाऱ्या मतदारसंघात तर  काँग्रेस, भाजप व बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते प्रचारादरम्यान आमने-सामने आले.  सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार करणे पसंत केले. दिवसभर एफएम केंद्रांवरून भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या प्रचाराची धून सुरु होती. भाजपने नरेंद्र मोदी, ‘आप’ कडून  केजरीवाल तर काँग्रेससाठी शीला दीक्षित मतांचा जोगवा मागत होत्या. ‘गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसने केलेला प्रचार तुम्ही पाहिलात’, असे आवाहन दीक्षित यांनी केले. तर ‘मैं नरेंद्र मोदी आपसे अनुरोध करता हूँ की.. ’अशा शब्दात मोदींनी आवाहन केले. तक ‘ झाडू को चलाना है, भ्रष्टाचार मिटाना है’, अशी उद्घोषणा केजरीवाल यांच्या आवाजावरून प्रसारित होत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp fear being swept aside by kejriwal led aap