जयपूर : ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा करेल,’ अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी दिली. ते म्हणाले, की या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीत कोणतीही मोठी कायदेशीर गुंतागुंत नसताना मोदी सरकार मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आगामी दहा वर्षे प्रतीक्षा करायला लावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना खरगे बोलत होते. ते म्हणाले, की संसदेत या विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेसने ते तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती. तसेच त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.  केंद्रात २०२४ मध्ये आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हा आम्ही सर्वप्रथम या विधेयकात तशी सुधारणा करू.

केंद्र सरकारने  अनुसूचित जाती-जमातींना काय महत्त्व दिले? संसदेच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ते दलित असल्याने निमंत्रित करण्यात आले नव्हते, असा आरोपही खरगे यांनी यावेळी केला.

हेही वाचा >>> एक निवडणूक संकल्पनेबाबत पक्ष, विधि आयोगाला आमंत्रण; उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय

मी अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना हा प्रश्न विचारतो, ही काही त्यांना काही प्रतिष्ठा दिली जाते का? लोकसभा अधिवेशन पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती बोलावतात. पण राष्ट्रपतींनाच येथे आदराचे स्थान नाही. आम्ही महिलांचा खूप आदर करतो, असा मोदींचा दावा कशाच्या आधारे आहे?

संसदेच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ते दलित असल्याने निमंत्रित करण्यात आले नव्हते, असा आरोपही खरगे यांनी यावेळी केला. संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, कलाकारांसह इतर अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते पण राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. हा त्याचां अपमान आहे. महिला आरक्षण विधेयक आणण्यामागील नरेंद्र मोदी सरकारच्या हेतूबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करून खरगे म्हणाले, की भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक आणले. कारण अनेक विरोधी पक्षांनी मिळून ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले.

‘महिलांना काँग्रेसकडूनच खरा न्याय!’

सरोजिनी नायडू या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या असे सांगून खरगे यांनी विचारले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची कोणतीही महिला अध्यक्ष झाली आहे का? संघाच्या उच्च पदापर्यंत कोणतीही महिला पोहोचली आहे का? काँग्रेस हाच महिलांचा खरा आदर करणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या काळात पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांत होत्या, मीरा कुमार लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या, याकडे खरगेंनी लक्ष वेधले.

जातनिहाय जनगणनेला मोदी का घाबरतात : राहुल

जयपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जातनिहाय जनगणनेचे समर्थन करताना देशाचे पंतप्रधान जात जनगणनेला का घाबरतात? असा सवाल केला. इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) सहभाग वाढवण्याचे काम जातनिहाय जनगणनेशिवाय होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chief mallikarjun kharge vows to amend women bill if congress comes to power zws