Amit Shah Remark on Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शाह यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.

अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. भाजपा आणि संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे, हे अमित शाह यांच्या विधानातून दिसून येते. आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत. जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. “भाजपा आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला. अशोक चक्राला त्यांचा विरोध होता. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही. म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का?”, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demands apology from amit shah for his comment on dr babasaheb ambedkar kvg