अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने आज दिल्लीत जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे. या ‘सत्याग्रहा’मध्ये काँग्रेसचे खासदार, त्यांच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्ली हजर राण्याचे आदेश

‘अग्निपथ’ योजनेमुळे आपल्या देशातील तरुण संतप्त झाले आहेत आणि ते रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधातील सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्ली हजर राण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाढदिवसानिमित्त उत्सव साजरे करण्यास राहुल गांधींचा नकार
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे न करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जमराम रमेश यांनी खासदार राहुल गांधी यांच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या नावाने जारी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, ‘राहुल गांधी यांनी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या हितचिंतकांना आवाहन केले आहे की. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव करू नये. देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण सर्वच चिंतेत आहोत. करोडो तरुणांचे मन दु:खी आहे. या तरुणांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी होऊया, त्यांच्या पाठीशी उभे राहूया. असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

मोदींना ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल
याअगोदर शनिवारी राहुल गांधींनी ट्विट केले होते की, ‘सलग ८ वर्षांपासून भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे मोदींना ‘माफिवीर’ बनून देशातील तरुणांची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल.’ असे राहुल म्हणाले होते.