पीटीआय, कोकराझार (आसाम)
भाजपच्या नेतृत्वातील सरकारने ‘बोडो’ करारावर स्वाक्षरी केली तेव्हा काँग्रेस पक्षाने या कराराची थट्टा केली होती. तथापि, या करारामुळे राज्यात शांतता प्रस्थापित झाली आणि विकासाला चालना मिळाली, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ते कोकराझारमध्ये ‘ऑल बोडो स्टुडंट्स युनियन’च्या (एबीएसयू) ५७व्या वार्षिक संमेलनाच्या वेळी बोलत होते.

बोडोलँडच्या विकासासाठी केंद्र सरकारने १५०० कोटींचा निधी दिला असल्याची माहिती शहा यांनी दिली. यावेळी त्यांनी बोडो तरुणांना २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू करण्याचे आवाहनही केले. या स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद शहरात आयोजित करण्यात येणार आहेत.

शांतता करारावर स्वाक्षरी करणाऱ्या ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड’ने आपले शस्त्र खाली ठेवले आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक पुढाकार घेतले असल्याचे शहा म्हणाले.

तरुण आता बंदुकांऐवजी हाती तिरंगा घेऊन फिरतात. या भागात शांतता नांदणार नाही असे काँग्रेसला वाटत असेल, आमच्यावर हसतही असतील. पण, करारातील ८२ टक्के तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री