Rahul Gandhi On Train Accident Mysore Darbhanga : तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री (११ ऑक्टोबर) घडली. या अपघातात दरभंगा एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, तर दोन डब्यांना आगही लागली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे तसेच अग्निशनदलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात ९ प्रवाशी जखमी झाले. जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या रेल्वे अपघाताच्या घटनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अनेक अपघात होऊनही सरकारने कोणताही धडा घेतला नाही. किती कुटुंबं उद्ध्वस्त झाल्यावर या सरकारला जाग येणार का?”, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये रेल्वेचा अपघात! म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

राहुल गांधी काय म्हणाले?

“म्हैसूर-दरभंगा ट्रेनचा अपघात बालासोरच्या भीषण बालासोरच्या भीषण अपघाताची आठवण करून देतो. एक प्रवासी ट्रेन एका थांबलेल्या मालगाडीला धडकली. अनेक अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असूनही काही धडा घेतलेला नाही. खरं तर ही जबाबदारी वरपासून सुरू होते. मात्र, या सरकारला जाग येण्यापूर्वी आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त करायची आहेत?”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, म्हैसूरहून दरभंगाला जाणारी एक्स्प्रेस तामिळनाडूतील कावराईपेट्टई रेल्वे स्थानकावर मालगाडीला धडकली. या घटनेनंतर रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली आणि काही डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मात्र, त्यानंतर घटनास्थळी तातडीने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर तातडीने प्रवाशाना मदत करण्यात आली. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या अपघातामुळे त्या मार्गावरून धावणाऱ्या दुसऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते.