संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी केवळ घोषणा देण्यात माहीर आहेत. मात्र, एक वर्षापासून मणिपूर जळत आहे. पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा केला नाही. दुसरीकडे पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत. त्यावर सरकार काहीही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “राष्ट्रपती संसदेच्या महत्वाचा भाग आहेत. आम्ही राष्ट्रपतींचा आदर करतो आहोत. यावर्षी राष्ट्रपतींचे पहिले अभिभाषण जानेवारीत झाले. त्यानंतर दुसरे अभिभाषण आता संसदेत झाले. मात्र, या अधिवेशनात राष्ट्रपतींचे जे अभिभाषण झाले, ते आणि पहिल्या अभिभाषणात काहीही फरक नव्हता. या भाषणात दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी काहीही नव्हते. अभिभाषणात फक्त सरकारचे कौतुक करणारे शब्द होते”, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

हेही वाचा : “संसदेत चर्चेविना नव्या कायद्यांची अंमलबजावणी”, सुप्रिया सुळेंचा आरोप; म्हणाल्या, “संविधानाचा आत्मा…”

“केंद्र सरकारने दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका प्रकरणातून जामीन मिळाला तर लगेच दुसऱ्या तपास यंत्रणांनी जेलमध्ये टाकले. मात्र, जनता कधीही माप करणार नाही. नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीला खिचडी म्हणून संबोधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण लोकसभा निवडणूक विरोधकांवर टीका करत लढवली. मोदींनी अनेकवेळा म्हटलं की, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मात्र, आता सरकारची परिस्थिती कशी आहे हे एक महिन्यात समजलं. नीट पेपर लीक, यूजीसी नीट लीक, सीएसआयआर नेट रद्द, राम मंदिराच्या छताला पावसात गळती, तीन दिवसांत तीन विमानतळाचे छत कोसळले. बिहारमध्ये पंधरा दिवसांत पाच पूल तुटले. टोल टॅक्स वाढवला”, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली.

खरगे पुढे म्हणाले, “पेपरफुटीचे आणि भ्रष्ट्राचाराचे प्रकरण समोर आले. पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होत आहे. आम्ही याबाबत आजाव उठवला तर विरोधकांवर टीका केली जाते. मात्र, हे सर्व ठीक कोण करणार? बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात पेपर फुटीचे प्रकरण समोर आले आहे”, असं म्हणत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना मल्लिकार्जुन खरगेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.