वर्धमान : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फारच कमी उमेदवार जिंकून येणार आहेत. काँग्रेसच्या जागा ‘सार्वकालिक नीचांकी’ असतील. निवडणुकीतील प्रचार पाहता हा सर्वात जुना पक्ष अर्धशतकही पार करण्यास धडपडत असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूर आणि कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील सभांना संबोधित करताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. केरळमधील वायनाडमध्ये पराभव जाणवत असल्याने उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला, असे सांगून मोदी यांनी राहुल यांच्या रायबरेलीतील उमेदवारीची खिल्ली उडविली. राहुल गांधी व काँग्रेसवर पळपुटेपणाचा आरोप केला. काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास ते अनुसूचित जाती, दलित आणि ओबीसींसाठी असलेले आरक्षण हिसकावून घेतील आणि ते ‘जिहादी मतपेढी’ला देईल. ‘इंडिया’ आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने ‘व्होट जिहाद’ अशी टिपप्णी केली आणि त्याला काँग्रेसचे समर्थन आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

हेही वाचा >>> अटकेचे तपशील द्या! ‘जीएसटी’अंतर्गत केलेल्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आपली राज्यघटना स्पष्ट सांगते की भारत सरकारने धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये. मात्र काँग्रेसला तेच करायचे आहे. कारण ओबीसी, दलित आणि आदिवासी मोदींना पाठिंबा देत असल्याने काँग्रेस त्यांच्यावर नाराज आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेस राज्यघटनेत दुरुस्ती करणार नाही, असे लेखी निवेदन द्यावे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress will get the lowest number of seats in lok sabha election claim by pm narendra modi zws