अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर आरोप

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. मात्र मोदी सरकार वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. करोनाचे संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्रायडे फ्लेम’ या कार्यक्रमात केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्र सेवा दलाच्या ८० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी, महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वास्त आमदार कपिल पाटील यांची या वेळी भाषणे झाली.

करोनाविरुद्ध लढत देण्यासाठी देशातील नागरिकांच्या एकजुटीचा निर्धार या वेळी करण्यात आला. ७ मेपासून गेले पाच शुक्रवार ‘फ्रायडे फ्लेम’ हे ऑनलाइन अभियान सुरू होते. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून अमर्त्य सेन यांनी भारतीयांना संबोधित केले.

अमर्त्य सेन या वेळी म्हणाले, भारताकडे औषध निर्मितीचे कौशल्य आहे. साथरोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची करोना महासाथीशी लढण्याची क्षमता चांगली होती. पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला सामोरे जाण्याबाबत चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर  संकट लादले.

अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात १७६९ साली अ‍ॅडम स्मिथ यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला. स्मिथ यांनी या लेखात म्हटलंय की, कुणी चांगले काम करत असेल तर त्याला त्याचे श्रेय मिळते. अनेकदा श्रेय मिळणे हे व्यक्ती किती चांगले काम करतेय याचे संकेत असतात. पण श्रेय उपटण्याचा प्रयत्न करणे ही वैचारिक दिवाळखोरी होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नेमकी हीच चूक केली, असा आरोप सेन यांनी केला.

मोठे बदल गरजेचे- डॉ. सेन

भारत आधीच सामाजिक विषमता, मंदगती विकास आणि बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत होता. सरकारच्या बेजबाबदार धोरणांनी करोना संकटात हे प्रश्न जास्त स्फोटक होत आहेत. अर्थव्यवस्थेची विफलता आणि सामाजिक एकजुटीच्या अभावाने देशातील करोना संकट अधिक गडद झाले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक निती या क्षेत्रात मोठे बदल केल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही. त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असेही अमर्त्य सेन म्हणाले.

करोनाविरुद्ध एकजूट करा- डॉ. राजमोहन गांधी

डॉ. राजमोहन गांधी यांनी, १९४६-४७ या काळासारखी आजची देशाची परिस्थिती आहे असे सांगून चिंता व्यक्त केली. हिंसा, द्वेष यांच्या विरोधात शांतताप्रेमी नागरिकांनी एकजूट करावी, अशा लोकांचे देशात असणे हाच आशेचा किरण आहे असे त्यांनी सांगितलं. करोनाविरुद्ध एकजुटीचा निर्धार देशवासीयांनी करावा, असे आवाहन देवी यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection modi government friday flame online campaign amartya sen akp