बघता बघता वर्ष सरले असून आता सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागले आहे. चालू वर्षातील वाईट आठवणी, चुका मागे सोडून आता येणाऱ्या वर्षात काहीतरी विधायक काम करण्याचा संकल्प प्रत्येकजण करत असेल. मात्र नव्या वर्षाचे स्वागत होणार असले तरी २०२२ या वर्षात काही न विसरणाऱ्यासारख्या घटना घडल्या आहेत. २०२२ या सरत्या वर्षात देशात असे काही खून झाले आहेत, ज्यांना विसरणं अशक्य आहे. श्रद्धा वालकरसारख्या हत्याकांडामुळे तर संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धा वालकर हत्याकांडासह २०२२ या वर्षात संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या महत्त्वाच्या खुनाच्या घटनांवर एकदा नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रद्धा लालकर खून प्रकरण

श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीत झालेल्या या खुनामुळे महाराष्ट्रदेखील सुन्न झाला होता. २०२२ सालाच्या शेवटी झालेल्या या खुनात आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे केले होते. आफताबच्या या निर्घृणतेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. पोलीस अद्याप या खुनाचा तपास करत आहेत.

आरोप आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे लिव्हइन पार्टनर होते. दोघेही दिल्लीमध्ये सोबत राहायचे. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यामुळे आफताबने श्रद्धाचा खून केला होता. या खुनानंतर तब्बल ६ महिन्यानंतर पोलिसांनी आफताबला अटक केली होती. तोपर्यंत आफताब खुलेआम फिरत होता. श्रद्धा आणि आफताब यांची ओळख मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. सोबत काम करताना या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर दोघेही दिल्लीमध्ये राहात होते.

लग्नाचा तगादा लावल्याने खून

श्रद्धा आणि आफताब यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. याच कारणामुळे श्रद्धा आफताबला लग्न करण्याचा हट्ट करू लागली. मात्र, आफताब नेहमीच लग्नाचा विषय टाळायचा. याच विषयाला घेऊन नंतर दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. त्यानंतर एके दिवशी श्रद्धा अचानक गायब झाली होती. ती नेमकं कोठे गेली, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. शेवटी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आरोपी आफताबने मुलगी श्रद्धाला फूस लावून पळवल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, श्रद्धाचा शोध सुरू झाल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आले. आरोपी आफताबनेच हत्या केल्याचे कबूल केले होते. त्याने श्रद्धाचे ३५ तुकडे केल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हा खून उघडकीस येऊ नये म्हणून आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. अशा प्रकारे आफताबने श्रद्धाचा निर्घृणपणे खून केला होता. सध्या आफताब पोलिसांच्या ताब्यात आहे.

अंकिता भंडारी हत्याकांड

२०२२ सालातील उत्तराखंडमध्ये झालेल्या अंकिता भंडारी हत्याकांडामुळेही देश सुन्न झाला होता. १९ वर्षीय अंकिता भंडारी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करायची. उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्या मालकीच्या या रिसॉर्टजवळील कालव्यात अंकिताचा मृतदेह आढळून आला होता. रिसॉर्टमधील अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुलकित आर्या आणि त्याचे साथीदार दबाव टाकत असल्याचे अंकिताने तिच्या मित्राला सांगितल्याचा दावा केला जातो. “मी जरी गरीब असले, तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही” असे व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे अंकिताने तिच्या मित्राला म्हटल्याचे समोर आले होते.

१८ सप्टेंबर २०२२ रोजी पुलकित आर्याच्या रिसॉर्टमधून अंकिता भंडारी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता रात्री आठच्या सुमारास पुलकित, रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्तासोबत हृषीकेशला गेली होती. या शहरातून परतत असताना आरोपी चिला रोड परिसरातील एका कालव्याजवळ दारू पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान, रिसॉर्टमध्ये आलेल्या पाहुण्यांसोबत गैरकृत्य करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करत अंकिताचा आरोपींशी जोरदार वाद झाला होता. ही बाब सार्वजनिक करण्याची धमकी देताच रागाच्या भरात आरोपींनी अंकिताला कालव्यात ढकलून दिले होते.

या प्रकरणात २४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या खुनाशी भाजपा नेते विनोद आर्या यांच्या मुलाचा संबंध असल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणामुळे सरकार बॅकफूटवर आले होते. सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर आणि सहाय्यक मॅनेजर अंकित गुप्ता यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

अंकिता सिंहला जाळलं, आरोपी हसत राहिला

ऑगस्ट २०२२ मध्ये झारखंडमध्ये झालेल्या अंकिता सिंह खून प्रकरणामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात आला होता. इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेल्या अकिंताच्या शरीरावर पेट्रोल टाकत तिचा खून करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली होती. शाहरुख नावाच्या आरोपीने ही हत्या केली होती. शाहरुखने पेट्रोल टाकून अंकिताच्या शरीराला आग लावल्यानंतर अंकिताच्या वडिलांसह अन्य लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अंकिता सिंहची २० ऑगस्ट २०२२ रोजी मृत्यूशी झुंज संपली होती. अंकिताला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्याता आले होते, तेव्हा ती ९० टक्के जळाली होती.

हेही वाचा- Flashback 2022 : ‘वन रॅंक, वन पेन्शन’ ते वडिलांच्या संपत्तीत मुलींना हक्क; २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेत ऐतिहासिक निर्णय, वाचा…

अंकिताची हत्या केल्याचे आरोपी शाहरुखला अजिबात दु:ख नव्हते. जेव्हा पोलीस त्याला न्यायालयासमोर हजर करत होते, तेव्हा तो हसत होता. त्याच्या चेहरऱ्यावर कसलीही भीती किंवा दु:ख दिसत नव्हते. यादेखील घटनेनंतर झारखंडमधील राजकारण तापले होते. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीला घेऊन येथे आंदोलन करण्यात आले होते. अंकिताच्या मृत्यूनंतर डुमका येथे तणाव निर्माण झाला होता. येथे कलम १४४ लागू करण्यात आले होते.

भागलपूरमध्ये महिलेचा स्तन, हात, कान कापून खून

बिहार राज्यातील भागलपूर येथे एका महिलेचा कान, हात तसेच स्तन कापून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे भारत सुन्न झाला होता. दुकानावर बसू न दिल्यामुळे तसेच चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे शकील नावाच्या आरोपीने या महिलेचा खून केला होता. शकीलने आपल्या भावाला सोबत घेऊन हा खून केला होता. या खुनामध्ये आरोपीने महिलेचे स्तन कापले, कान तसेच दोन्ही हातही कापले होते. विशेष म्हणजे तो महिलेचे पायदेखील कापणार होता. मात्र तो तसे करू शकला नव्हता.

हेही वाचा- Flashback 2022 : ‘मंकीपॉक्स’ ते ‘टोमॅटो फ्ल्यू’; २०२२ मध्ये ‘या’ नऊ विषाणूंनी जगभरात घातले थैमान, वाचा…

खून झालेली महिला आणि तिचा पती ज्या गावात राहायचे त्याच गावात आरोपी शकीलदेखील राहायचा. मृत महिलेचा पती येथे एक किराना दुकान चालवायचा. या कामात मृत महिला त्याला सहकार्य करायची. याच दुकानावर आरोपी शकील येऊन बसायचा. त्याचे कोणतेही काम नसताना दुकानावर बसणे खटकल्यामुळे मृत महिलेने आरोपीला दुकानावर बसू नये असे सांगितले होते. तसेच त्याच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. याचाच राग मनात धरून आरोपी शकीलने त्याच्या भावाला सोबत घेऊन भागलपूर जिल्ह्यातील या महिलेचा निर्घृण खून केला होता.

हेही वाचा- Flashback 2022 : २०२२ मध्ये ‘या’ 5 गॅजेट्सनी घेतला ग्राहकांचा निरोप, फीचर्समुळे राहिले चर्चेत

श्रद्धा वालकर असो अंकिता सिंह किंवा अंकिता भंडारी असो, यांच्या खून प्रकरणामुळे २०२२ हे वर्ष दु:खद ठरले. या सर्व प्रकरणांत मृत महिला, तरुणींचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या हत्याकांडांमुळे २०२२ हे वर्ष नेहमीच लक्षात राहील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime in india year 2022 shraddha walkar ankita bhandari ankita singh violence murder cases prd
Show comments