जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान शहीद झाला. मंगळवारी रात्रीपासून ही चकमक सुरू असून, यात दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मूपासून ६० किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सईदा सुखेल खेड्यात घुसलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दलाने मोहीम हाती घेतली (पान ८ वर) (पान १ वरून) आहे. सुरक्षा दलांवर या दहशतवाद्याने पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान कबीर दास हे गंभीर जखमी झाले होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असल्याच्या शक्यतेने शोधमोहीम सुरू आहे. शहीद जवान कबीर दास यांनी या मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याचे अतिरिक्त साहाय्यक पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी स्पष्ट केले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय आहे. गोळीबारात एक नागरिक जखमी झाला.

शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार

छिंदवाडा : शहीद कबीर दास हे मुळचे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील आहेत. आठ दिवसांपूर्वीचे ते रजा संपवून जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यांचे पार्थिव गुरुवारी पुलपल दोह त्यांच्या मूळगावी आणले जाईल व तेथे अत्यंसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

हेही वाचा >>> नीट-यूजी’चे पावित्र्य अबाधितच! एनटीए अधिकाऱ्यांचा दावा; परीक्षेत केवळ ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती

डोडा येथे गोळीबार

दुसऱ्या एका घटनेत डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भद्रव-पठाणकोट मार्गावर चत्तरगल्ला येथे राष्ट्रीय रायफल्स व पोलिसांच्या संयुक्त तपासणी नाक्यावर हल्ला केला. यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान जखमी झाले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. जम्मू विभागात गेल्या चार दिवसांतील दहशतवाद्यांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. रविवारी सायंकाळी शिवखोरी मंदिरातून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेत वाहन दरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू तर ४१ जण जखमी झाले होते.

केंद्रावर काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल असल्याचे या हल्ल्यांमधून उघड होत असल्याची टीका काँग्रेसने केली. देशाविरोधात कारवाया करणारे भाजप सरकारला का सापडत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिनंदनपर संदेशांना उत्तर देण्यातच व्यग्र असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf jawan killed in encounter with terrorists in jammu and kashmir zws