वृत्तसंस्था, स्टॉकहोम

देशांच्या समृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विषद करणारे आणि देशांच्या यशापयशाची मांडणी करणाऱ्या अमेरिकी वंशाचे ब्रिटीश अभ्यासक डॅरेन अॅसमोगलू, सायमन जॉन्सन आणि तुर्क वंशाचे अमेरिकी अभ्यासक जेम्स ए. रॉबिन्सन यांना सोमवारी अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर करणाऱ्या समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन म्हणाले, ‘‘देशादेशांमधील उत्पन्नातील तफावत कमी करणे हे आताच्या काळातील सर्वांत मोठे असे आव्हान आहे. नोबेल पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे, त्यांनी समाजामधील संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एखादा देश यशस्वी किंवा अयशस्वी का होतो, याची मूळ कारणे त्यांच्या संशोधनातून मिळतात. आज जगात, विशेषत: भ्रष्टाचार आणि हुकुमशाही असलेल्या देशांत विषमता का आहे, यावर त्यांनी संशोधन केले. संस्थांची निर्मिती कशी होते आणि देशाच्या समृद्धीवर त्याचा परिणाम कसा होतो, या संशोधनावर त्यांचे जगभरातून कौतुक होत आहे. दुर्बल संस्थात्मक वातावरणामागचे मूळ त्यांनी शोधले. कमी आर्थिक उत्पन्न असलेले अनेक देश यामध्ये येतात.’’

हेही वाचा >>>Lawrence Bishnoi : सलमान खानप्रमाणे ‘हे’ १० जण बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर, NIA समोर लॉरेन्सनेच दिलेली कबुली

अॅसमोगलू आणि जॉन्सन मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत आहेत आणि रॉबिन्सन यांनी शिकागो विद्यापीठातून संशोधन केले आहे. अॅसमोगलू यांना नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे. ‘पुरस्कार मिळाल्याने खूप मोठा धक्का बसला आहे आणि आश्चर्यही वाटले आहे. अशी अपेक्षा मी कधीही केली नव्हती,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यापूर्वी मिल्टन फ्राइडमन, जोन नॅश, अमेरिकेचे माजी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष बेन बर्नानके आदींचा या पुरस्काराने गौरव केला आहे.

संशोधन नेमके कशाचे?

युरोपीयनांच्या वसाहतवादाचा जगावर कसा परिणाम घडला, यावर संशोधकांनी प्रकाश टाकला आहे. वसाहतवाद्यांनी तेथील संसाधनांच्या लुटीवर लक्ष दिले, की युरोपीय स्थलांतरितांसाठी चांगल्या संस्था उभारण्यावर लक्ष दिले, यावर ते अवलंबून असल्याचे संशोधनात म्हटले आहे. एकेकाळी श्रीमंत असणारे देश वसाहतवादानंतर गरीब कसे झाले, हे त्यांनी दाखवून दिले. याउलट, काही गरीब देशांत संस्थात्मक उभारणीमुळे त्या देशांची कशी भरभराट झाली, हे संशोधनातून दाखवले आहे.

लोकशाहीला पुरक अशा गटांनी संशोधनाची माहिती गोळा केली आहे. जगभरात अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या संस्था दुर्बल झाल्या आहेत. लोकशाहीवादी देश एका कठीण काळातून जात आहेत, असे मला वाटते. तसेच, चांगल्या, स्वच्छ प्रशासनासाठी, लोकशाही अधिकाधिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकांनी आवाजही उठवला आहे, हे महत्त्वाचे आहे.-डॅरेन अॅसमोगलू, नोबेल पुरस्कारार्थी