जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात सोमवारी झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद तर अन्य ५ जवान जखमी झाले होते. लष्कराच्या गस्ती पथकावरील या प्राणघातक हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जमिनीवरील शोधपथकांना हेलिकॉप्टर तसेच मानवरहित हवाई पाळत (यूएव्ही) ठेवून मदत केली जात आहे. या भागातील काही घनदाट जंगल भागांवर लक्ष केंद्रित करून कारवाईत स्निफर डॉग आणि मेटल डिटेक्टरही कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

कथुआ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अंदाजे १५० किमी अंतरावर लोहाई मल्हारमधील बदनोटा गावाजवळील माचेडी-किंडली-मल्हार या डोंगराळ रस्त्यावर लष्कराच्या गस्ती पथकावर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. याच पार्श्वभूमीवर लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे (सीआरपीएफ) माचेडी, बडनोटा, कुंडली आणि लोहाई मल्हार परिसरासह आसपासच्या भागात संयुक्त शोधमोहीम सुरू केली असून, येथील मोठ्या भागाला घेराव घातला आहे. दहशतवाद्यांची शोधमोहीम सोमवारीच सुरू करण्यात आली. परंतु मुसळधार पावसामुळे ती सायंकाळी थांबवण्यात आली, मंगळवारी सकाळपासून पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली.

हेही वाचा >>> मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार दहशतवाद्यांनी माचेडी हल्ल्याचा कट रचा. २८ एप्रिल रोजी पनारा गावात दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. यात गावाचे संरक्षण रक्षक मोहम्मद शरीफ मारले गेलेल्या बसनगड हल्ल्यात या दहशतवाद्यांचा सहभाग होता. सुरक्षा दलांनी जूनमध्ये कथुआ जिल्ह्यातील बानी, डग्गर आणि किंडली भागात दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या होत्या. त्यानंतर या भागात दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेस सुरुवात झाली.

मदतीसाठी एनआयए

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याच्या तपासात जम्मू आणि काश्मीर पोलिसांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साहाय्य करणार आहे. ‘एनआयए’ अधिकाऱ्यांचे एक पथक कथुआ येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराच्या ह्यपॅराह्ण युनिटचे विशेष दल या भागात दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस महासंचालकांकडून आढावा

माचेडी : जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आर. आर. स्वैन यांनी मंगळवारी लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी आणि त्यांना निष्फळ करण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) विजय कुमार आणि जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांच्यासमवेत स्वैन यांनी पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लष्करात भरतीसाठी महाविद्यालय सोडले

न्यू टिहरी : दहशतवादी हल्ल्यात रायफलमॅन आदर्श नेगी हे २५ वर्षीय जवान शहीद झाले. वडील दलबीर सिंग नेगी यांच्याशी रविवारी त्यांचा फोनवरून शेवटचा संवाद झाला. दुसऱ्या दिवशी दलबीर सिंग यांना दुसरा फोन आला, ज्यामध्ये त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. यानंतर उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील थाटी डागर गावात एकच शोककळा पसरली. शेतकरी कुटुंबातील आदर्श नेगी हे तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होते. लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले होते.

हा भ्याड हल्ला : राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हे भ्याडपणाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते, असे राष्ट्रपतींनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

वकिलांकडून निषेध

जम्मू बार असोसिएशनच्या वकिलांनी मंगळवारी पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. ज्येष्ठ वकील विक्रम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

संरक्षणमंत्र्यांकडून शोक

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. या कठीण काळात देश शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दहशतवादविरोधी कारवाया सुरू आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले. तर जवानांचे बलिदान व्यर्थ होऊ दिले जाणार नाही, या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींचा भारत पराभव करेल, असे संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे म्हणाले.