Delhi Election result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की, आम आदमी पक्षाच्या १६ उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपाने मंत्रीपद आणि १५ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली आहे.
“काही एजन्सी दाखवत आहेत की शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला ५५ हून अधिक जागांवर विजय मिळत आहे. गेल्या १६ तासात आमच्या १६ उमेदवारांना फोन आले आहेत की ‘आप’ सोडून त्यांच्या पक्षात या, मंत्री बनवू आणि प्रत्येकाला १५-१५ कोटी देऊ. जर यांच्या पक्षाच्या ५५ हून अधिक जागा येत असतील तर आमच्या उमेदवारांना फोन करण्याची काय आवश्यकता आहे? यावरून हे स्पष्ट आहे की बनावट सर्व्हे करवून घेण्यात आले जेणेकरून वातावरण तयार करत काही उमेदवारांना फोडता येऊ शकेल. पण शिवीगाळ करणाऱ्यांनो आमचा एकही उमेदवार फुटणार नाही”, असे केजरीवाल म्हणाले आहेत.
गुरुवारी तीन एग्झिट पोलमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ४८-४९ टक्के मते मिलेली आणि ७० जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत ४५-६१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ही पोस्ट केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणेच सुलतानपूर माजरा येथील आपचे उमेदवार आणि दिल्ली सरकारमधील मंत्री मुकेश अहलावत यांनी देखील ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. “मी मेलो, माझे तुकडे केले तरी पण मी अरविंद केजरीवाल यांना कधीही सोडणार नाही,” असे मुकेश अहलावत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“मला या नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितलं की, त्यांचे सरकार स्थापन होत आहे, मंत्री बनवू आणि १५ कोटीही देऊ. आप सोडून इकडे या. मी त्यांना सांगू इच्छितो की जो सन्मान केजरीवाल आणि आप पक्षाने मला दिला आहे, मी मरेपर्यंत आपला पक्ष सोडणार नाही”, असेही अहलावत म्हणाले आहेत.
गुरूवारी आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. त्यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाच्या सात आमदारांना भाजपा नेत्यांच्या ऑफरबद्दल एखा व्यक्तीने संपर्क साधला. यामधून दिसून येते की भाजपाने निकालापूर्वीच पराभव मान्य केला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असे डावपेच खेळले जात आहेत असेही सिंह म्हणाले.
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी आप नेत्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. हे आपच्या निवडणुकीतील पराभवाबद्दलच्या निराशेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
संजय सिंह यांनी त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे विरेंद्र सचदेवा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
उद्या दिल्ली विधानसभेचा निकाल
बुधवारी दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. तर शनिवारी (फेब्रुवारी ८) मतमोजणी केली जाणार आहे. सध्या या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दिल्लीत आप सलग तिसर्यांदा सत्तेत येणार की भाजपा २७ वर्षांची प्रतिक्षा संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.