दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून जाणीवपूर्वक कमी कॅलरीचा आहार घेत असल्याचा आरोप दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंताही व्यक्त केली आहे.

नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

न्यायालयीन कोठडीत असलेले अरविंद केजरीवाल हे मागील काही दिवसांपासून जाणीवपूर्वक कमी कॅलरीचा आहार घेत आहेत. त्यांना असलेला मधूमेह लक्षात घेता, दिवसांतून तीन वेळा आहार दिला जातो. मात्र, मागच्या काही दिवसांत त्यांनी दिवसांतून तीन वेळा योग्य पद्धतीने आहार घेतलेला नाही. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो आहे, असं नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal : “तुरुंगात केजरीवालांचं ८.५ किलो वजन घटलं”, ‘आप’च्या दाव्यानंतर तुरुंग अधीक्षकांनी मांडली साडेतीन महिन्यांची आकडेवारी

कमी कॅलरीमुळे अरविंद केजरीवालांच्या वजनात घट

कमी कॅलरीचा आहार घेत असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वजनात घट झाल्याचेदेखील त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक कॅमी कॅलरीचा आहार घेत असल्याने यांच्या वजनातदेखील घट झाली आहे. २ जून रोजी त्यांचे वजन ६३.५ किलो होते. मात्र, १३ जुलै रोजी त्यांचे वजन ६१.५ किलो नोंदवण्यात आले, असंही वी. के. सक्सेना यांनी सांगितले.

अरविंद केजरीवालांच्या प्रकृतीबाबत व्यक्त केली चिंता

पुढे या पत्रात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत केजरीवाल यांनी योग्य तो आहार घ्यावा, अशी विनंती केली आहे. मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विनंती करतो, की त्यांनी योग्य तो आहार घ्यावा. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?

दिल्लीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

दरम्यान, नायब राज्यपालांच्या या आरोपाबाबत आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, नायब राज्यपालांच्या या आरोपानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.