नवी दिल्ली : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी आहे असे वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा, मी राजीनामा देईन’, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत असतील. या ‘योगायोग’बद्दल, फडणवीस दिल्लीत येणार हे मला इथे आल्यावरच समजले, असे मुंडे म्हणाले. दिल्लीत मुंडे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली.

या प्रकरणाची सीआयडी, विशेष चौकशी पथक व न्यायालयीन चौकशीही होत असून हत्येच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे पुरावे असल्याशिवाय कोणाचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते.

या प्रकरणामध्ये ५१ दिवस माझ्याविरोधात ‘ट्रायल’ घेतली जात आहे. मी माझ्या लोकांशी प्रामाणिक आहे. मी नैतिक आहे आणि देशमुख हत्येप्रकरणात मी दोषी नाही आणि हे माझे मत मला माझ्या वरिष्ठांना सांगावे लागेल.धनंजय मुंडे, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा

Story img Loader