बोधगया येथील महाबोधी मंदिरात रविवारी सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा तर संबंध नाही, असा सवाल उपस्थित करीतच आज अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मोदींसह भाजप आणि संघावर शरसंधान केले. दिग्विजय सिंह यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, अशा शब्दांत भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिले. अशा गंभीर प्रकरणांमध्ये पतंगबाजी करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसनेही नेहमीप्रमाणे दिग्विजय सिंहांनी व्यक्त केलेल्या संशयापासून स्वत:ला दूर ठेवले.
नरेंद्र मोदी यांनी बिहार भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धडा शिकविण्याचे आवाहन केले होते. हाच धागा पकडून आज दिग्विजय सिंह यांनी मोदींवर शरसंधान केले. मोदींनी नितीशकुमार यांना धडा शिकविण्याची गोष्ट केली होती. बोधगयात झालेल्या बॉम्बस्फोटांशी मोदींच्या भाषणाचा संबंध आहे काय, असा सवाल दिग्विजय यांनी ट्विटरवर उपस्थित केला.