ओशो अर्थात आचार्य रजनीश यांच्या विद्वत्तेचं, त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचं, प्रवचनांचं गारुड आजही लोकांच्या मनावर कायम आहे. आपल्या बोलण्यातून ते अशा प्रकारे मोहिनी घालत असत की त्यांचं म्हणणं पटत असे. अध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कारकिर्दीत वादांचेही अनेक अध्याय आले. मात्र सगळ्यांना तोंड देऊन ते पुढे गेले. ‘ओशो कधीही जन्माला आले नाहीत, कधी वारले नाहीत, ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या कालावधीत त्यांनी पृथ्वीला भेट दिली.’ या आशयाचं वाक्य ओशोंच्या समाधीवर कोरलं गेलं आहे. अवलिया हा शब्द त्यांना अगदी चपखलपणे बसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओशोंच्या मृत्यूचं गूढ आजही कायम

आपल्या आयुष्याचा प्रवास मृत्यूमुळेच पूर्ण होतो त्यामुळे मृत्यूचा शोक नाही तर उत्सव साजरा केला पाहिजे असं ओशो म्हणत असत. ओशोंच्या मृत्यूला ३४ वर्षे उलटली तरीही त्यांचे असे काही विचार, त्यांचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. ओशो नावाभोवती असलेलं वलय आजही कायम आहे यात शंकाच नाही. याच ओशोंनी आपल्या एका प्रवचनात अकबर बिरबल यांची वेगळीच गोष्ट सांगितली होती. अकबर बिरबल यांच्या चातुर्यकथा आपण अनेकदा वाचल्या आहेत. मात्र ओशोंनी सांगितलेली ही कथा फार वेगळी आहे.

काय आहे ओशोंनी सांगितलेली ती गोष्ट?

एकदा अकबराने त्याच्या दरबारात नवरत्नांना बोलवलं. मी आता वृद्ध झालो. या देशात रामायण घडलंय. मी देखील रामापेक्षा छोटा राजा नाही. माझ्या आयुष्यावर रामायण लिहिता येणार नाही का? आठ रत्नांना उत्तर सुचलं नाही. अकबर कितीही मोठा सम्राट असला तरीही त्यांच्यावर रामायण कसं लिहिणार? असा प्रश्न त्यांना पडला. तेवढ्यात बिरबल म्हणाला, हो लिहिलं जाऊ शकतं. तुमच्यावर रामायण लिहायचं असेल तर मी लिहिन. पण हे काम खूप मेहनतीचं आहे, शास्त्रानुसार मला सगळं लिहावं लागेल. मला १ लाख अशरफी हव्या त्यावेळी मी तुमच्यावर रामायण लिहू शकेन. तसंच मला एक वर्षाचा कालावधी लागेल. अकबाराने तातडीने होकार दिला. १ लाख अशरफी दिल्या, वर्षभराची सुट्टीही बिरबलाला दिली. त्यानंतर बिरबल एक लाख अशरफी मिळाल्याने बिरबल वर्षभर अय्याशी करु लागला. त्याने रामायण वगैरे काहीही लिहिलं नाही. अकबर चौकशी करत होता त्यावर बीरबल काम सुरु आहे त्यावर असं उत्तर देत असे. शेवटी वर्ष संपलं. अकबराने बीरबलाला विचारलं रामायण कुठे आहे? बिरबल म्हणाला तुमच्यावर रामायण लिहून झालंय, फक्त एक गोष्ट राहिली आहे जी तुम्हीच सांगू शकता त्याशिवाय रामायण अपूर्णच राहणार आहे. असं म्हणून बिरबलाने अकबराला विचारलं, आमच्या रामाची पत्नी असलेल्या सीतेला रावणाने पळवून नेलं होतं. तुमच्या बेगमना कुठल्या रावणाने पळवलं होतं सांगा. त्या रावणाचा पत्ता, नाव मला सगळं सांगा. बिरबल जे म्हणाला ते ऐकून अकबर रागाने लालबुंद झाला. तलवार उगारत बिरबलाला म्हणाला तू वेडा झाला आहेस का? तुझी जीभ कापून हातात देऊ का? त्यावर बिरबल म्हणाला मग तुमच्यावर रामायण लिहिता येणार नाही. कारण रामायणात तर सीतेला रावण पळवून नेला होता. याशिवाय रामायण पूर्णच होणार नाही. अकबर वैतागला आणि म्हणाला की अशी झंझट असेल तर रामायण लिहूच नकोस माझ्यावर. बिरबल म्हणाला ठिक आहे जशी तुमची इच्छा पण माझी वर्षभराची मेहनत वाया गेली.

ओशो त्यांच्या प्रवचनात विविध गोष्टी सांगत असत, उदाहरणं देत असत

यानंतर अकबर बिरबलाला म्हणाला, मी तर महाभारताविषयीही बरंच ऐकलंय. रामायणापेक्षा महाभारत हा मोठा ग्रंथ आहे. तुमच्यावर महाभारत लिहायचं असेल तर आता मला दोन लाख अशरफी लागतील असं बिरबल म्हणाला. अकबर म्हणाला ते तुला मिळेल पण मला सांग यात रावण, सीतेचं अपहरण असं काही नाही ना? बिरबल म्हणाला यात रावण नाही, सीतेचं अपहरण नाही. अकबर म्हणाला ठीक आहे माझ्यावर महाभारत लिहि. हे घे दोन लाख अशरफी आणि वर्षभराची सुट्टी तुला मंजूर. बिरबलाने पुन्हा वर्षभर अय्याशी केली, मजा केली. मधे मधे निरोप पाठवत होता की हो माझं काम सुरु आहे. मुदत संपल्यावर पुन्हा रिकाम्या हाताने दरबारात आला. बिरबल बादशहा अकबराला म्हणाला, महाभारतात द्रौपदीचे पाच पती होते. तुमच्या बेगमचे तर तुम्ही एकच पती आहात, बाकीचे चार कोण आहेत? मला त्यांची नावं सांगा. अकबराने पुन्हा तलवार उगारली. बिरबल तू काय समजतोस काय? मी जिवंत असताना राणीला पती असणार आहेत का? बिरबल शांतपणे म्हणाला मी काय करु शकतो? मी लिहिलं की त्यात अशा अडचणी येतात. तुम्हाला हवं असेल तर तुमच्यावर वेद लिहितो. अकबर वैतागून म्हणाला असं काहीही मला लिहूनच घ्यायचं नाही. दुसऱ्याची गोष्ट तुम्ही स्वतःची म्हणून सांगू शकत नाही. राम, कृष्ण, बुद्ध, क्राईस्ट काहीही होऊ नका. तुम्ही जे आहात तेच राहा. स्वतःला ओळखा. हे उदाहरण देत ओशोंनी एका प्रवचनात ही गोष्ट सांगितली होती.

आपल्या प्रवचनांमधून अशा प्रकारच्या गोष्टी सांगत, विविध प्रकारचे दाखले, उदाहरणं देत ओशो त्यांचं म्हणणं पटवून द्यायचे. ओशो यांचं खरं नाव चंद्रमोहन जैन होतं. त्यांना लहानपणापासून तत्त्वज्ञान आणि गूढ गोष्टींची आवड होती. ओशो यांच्या ‘ग्लिंप्सेस ऑफ माय गोल्डन चाइल्डहूड’ या पुस्तकात हा उल्लेख आहे. जबलपूर विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी विविध विचारधारांचा आणि धर्मांचा सखोल अभ्यास केला. देशभरात त्यांची प्रवचनं सुरु झाली. हळूहळू प्राध्यापक रजनीश यांना आचार्य रजनीश म्हटलं जाऊ लागलं आणि मग पुढे त्यांना ‘भगवान’ आणि ‘ओशो’ अशी बिरुदंही त्यांच्या अनुयायांनी दिली.

आज ओशो अर्थात आचार्य रजनीश यांची पुण्यतिथी आहे.

ओशो यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम

१९ जानेवारी १९९० या दिवशी पुण्यातल्या कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या ओशो आश्रमात आचार्य रजनीश अर्थात ओशोंचा मृत्यू झाला. ओशो त्यांच्या संपूर्ण आयुष्यात विविध वादांमुळे चर्चेत राहिले. तसंच त्यांच्या प्रवचनांमुळे आणि त्यांच्या पुस्तकांमुळेही चर्चेत राहिले. मात्र त्यांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला नाही हे कायम सांगितलं जातं. ओशोंनी रजनीशपुरम नावाचा एक देशच वसवला होत्या. मात्र तिथे काही मतभेद झाले. त्यांची शिष्या आनंदशिला यांना अटक झाली. आनंद शीला यांनना २० वर्षांची शिक्षाही झाली. शीलावर अनेक आरोप लागले होते. तसंच ओशोंनी हे आपल्याला अंधारात ठेवून चाललं होतं असंही सांगितलं होतं. मात्र अमेरिकेला रजनीशपुरम उद्ध्वस्त करण्याची संधीच मिळाली. ओशोंनाही अटक झाली. अमेरिकेसह २१ देशांमध्ये जाण्यास त्यांच्यावर बंदीही घालण्यात आली. ओशोंकडे ९३ रोल्स रॉईस कार होत्या ज्यातल्या बहुतांश कार्स विकण्यात आल्या. १९८५ मध्ये हे सगळं सोडून ओशो भारतातल्या पुण्यात जो आश्रम आहे तिथे आले. मात्र १९९० मध्ये त्यांचं निधन झालं.

‘Who Killed Osho’ या पुस्तकात काय उल्लेख?

ओशोंच्या आयुष्यात अनेक वाद होते. तसंच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृत्यूचं गूढ आणि त्यावरुन वाद होऊ लागले. अमेरिकेत असताना ओशोंना स्लो पॉयजनिंग करण्यात आलं होतं असा एक दावा केला गेला. कारण माझ्यावर विषप्रयोग झाल्यासारखं मला वाटतंय असं ओशो स्वतःच पुण्यात म्हणाले होते. तर दुसऱ्या एका थिअरी नुसार ओशोंची हत्या करण्यात आली. पत्रकार अभय वैद्य यांनी ‘Who Killed Osho’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात वैद्य यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. १८ जानेवारी १९९० च्या रात्री १ वाजता डॉ. गोकुळ गोकाणी यांना फोन आला. त्यांना सांगण्यात आलं आश्रमात कुणाची तरी प्रकृती बिघडली आहे लगेच या. २०१५ मध्ये याबाबत गोकुळ गोकाणी यांनीच एक वक्तव्य केलं. त्या रात्री जेव्हा आश्रमात पोहचलो तेव्हा चार तासांनी ओशोंच्या खोलीत मला जातं आलं. ओशोंच्या हातावर उलटीच्या खुणा होत्या. मी ओशोंना पाहिलं तेव्हा वाटलं की कुणीतरी त्यांच्या मृत्यूची वाट बघत होतं. यावर वैद्य यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आश्रमात जर डॉक्टर्स होते तर डॉ. गोकुळ गोकाणींना बाहेरुन आश्रमात का बोलवण्यात आलं? ओशोंची प्रकृती बिघडली होती तर मग त्यांना रुग्णालयात का नेण्यात आलं नाही? गोकाणींच्या म्हणण्यानुसार त्यांनी ओशोंना शेवटचा श्वास घेताना पाहिलं नाही. गोकाणी यांनी जयेश आणि अमृतो या त्यांच्या खोलीत असलेल्या दोघांना मृत्यू कसा काय झाला असं विचारलं त्यावर हृदयविकाराचा झटका आला असं लिहा हे सांगण्यात आल्याचं गोकाणी म्हणाले होते. कारण शवविच्छेदन करायचं नव्हतं. तसंच अभय वैद्य म्हणतात ओशो आश्रमात कुणाचा मृत्यू झाला तर उत्सव साजरा व्हायचा. मात्र ओशोंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर घाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं नाही. या सगळ्याची कारणं काय? असेही प्रश्न वैद्य यांनी त्यांच्या पुस्तकात विचारले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know birbal this story told by osho with the example of ramayana maindc scj
Show comments