Farmers Delhi March From Shambhu Border : किमान आधारभूत किमतीच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी २९७ दिवसांपासून शंभू सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी शुक्रवारी दुपारी १ वाजता शंभू सीमेवरून दिल्लीपर्यंत मोर्चा काढणार आहेत. शंभू-खनौरी सीमेवर सुमारे १० हजार शेतकरी जमा झाले आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दोन्ही सीमेवर निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वप्रथम शेतकऱ्यांचे १०१ सदस्यीय पथक पुढे जाईल. त्यांना हरियाणा सीमेवर दाखल करण्यासाठी १५० सदस्यांचे बचाव पथक त्यांच्या मागे असणार आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शंभू सीमेवर बॅरिकेड्स उभारले आहेत. सिमेंटच्या भिंतींना लोखंडी खिळे व काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. याशिवाय, वॉटर कॅनन व्हॅन आणि अश्रुधुराचे शेल फेकणाऱ्या ड्रोनने सुरक्षा चक्र अधिक मजबूत केले आहे. हरियाणा पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत.

हे ही वाचा : ‘पुष्पा २’च्या शो दरम्यान भर थिएटरमध्ये अज्ञाताने फवारला विषारी गॅस; मुंबईत नेमकं काय घडलं? पहा व्हिडिओ

शेतकऱ्यांची भूमिका

या दिल्ली मार्चबाबत बोलताना शेतकरी नेते सवर्नसिंह पंढेर म्हणाले, “शेतकऱ्यांचे १०१ सदस्यांचे पथक दिल्लीकडे दुपारी १ वाजता कूच करेल. याबाबत सरकारने काय करायचे हा त्यांचा निर्णय असेल. सरकारमध्ये असणारे केंद्रातील आणि राज्यातील नेते सतत म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलक ट्रॅक्टर-ट्रॉलीशिवाय आले तर काही हरकत नाही. त्यामुळे आम्ही दिल्लीला पायी जात असेल तर आम्हाला रोखण्याचे कोणतेच कारण नाही.”

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

एमएसपी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, शेतमजुरांसाठी पेन्शन, वीज दरात वाढ करू नये, आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे आणि २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे. सुरक्षा दलांनी दिल्लीकडे निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा १३ फेब्रुवारीला रोखल्यापासून शेतकरी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत.

हे ही वाचा : ‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता

पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्यापूर्वी शंभू सीमेवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. आंदोलकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी अधिक सैन्य तैनात केले आहे. अंबाला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात बेकायदेशीरपणे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers march 101 member jatha from shambhu border to delhi modi government aam