पीटीआय, भरूच

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील बहुतेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. बडोदा, भरूच, नर्मदा, दाहोद, पंचमहल, आनंद आणि गांधीनगर जिल्ह्यातील ११,९०० नागरिकांना निवारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे, तर अडकलेल्या २७० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार सरोवर धरणातून विसर्ग केल्यामुळे गेल्या दोन दिवसांत पाण्याची पातळी ४० फुटांवर गेल्याने भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर राहणाऱ्या ६,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नर्मदा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

हेही वाचा >>>“हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

भरूच जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अंकलेश्वर- भरूच मार्गावर असणाऱ्या गोल्डन ब्रिजवर नर्मदा नदीची सध्याची पाण्याची पातळी ३७.७२ फूट आहे. येथे पूर नियंत्रण रेषा २८ फूट असल्याने त्यापेक्षा १० फूट अधिक पाण्याची पातळी आहे. भरूच शहरातील दांडिया बाजार व इतर भाग तसेच अंकलेश्वर शहर व तालुक्यातील अनेक सोसायटय़ा व गावे अजूनही गुडघाभर पाण्यात बुडाली आहेत. पाणी हळूहळू कमी होत असल्याने परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation in gujarat due to heavy rains amy