पीटीआय, ब्रिस्बेन

भारत आणि चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात केलेल्या प्रगतीमुळे अन्य मुद्द्यांवरही प्रगती होण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी व्यक्त केला. सैन्यमाघारी हे स्वागतार्ह पाऊल असल्याचे ते यावेळी म्हणाले. ब्रिस्बेन येथे आयोजित कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना जयशंकर यांनी विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले.

पूर्व लडाखमधील डेमचॉक आणि डेप्साँग येथे सैन्यमाघारी केल्यानंतर जयशंकर यांनी त्याविषयी भाष्य केले आहे. जयशंकर म्हणाले की, ‘भारत, चीनबद्दल बोलायचे तर, आम्ही काही प्रगती केली आहे. काही कारणांमुळे आमचे संबंध फार बिघडले होते. आता आम्ही थोडी प्रगती केली आहे, त्याला आम्ही सैन्यमाघारी म्हणतो. त्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या फार जवळ आले होते. त्यामुळे काही अघटित घडण्याची शक्यता होती.’

हेही वाचा >>>धक्कादायक! हॉर्न का वाजवता? विचारल्याने दोन बहि‍णींकडून माजी पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची गेल्या महिन्यात रशियामध्ये भेट झाली. त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्र्यांचीही चर्चा अपेक्षित आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.

जगाबरोबर प्रगती साधायची!

आम्हाला जगाच्या बरोबरीने प्रगती साधायची आहे, असे जयशंकर यांनी या कार्यक्रमात सांगितले. अनेक देशांची भारताबरोबर काम करण्याची खरोखर इच्छा आहे असे ते यावेळी म्हणाले.

Story img Loader