भाजपाचा माजी खासदार आणि टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ISIS काश्मीर नावाच्या संघटनेने ही धमकी दिली आहे. ज्यानंतर या संघटनेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुधवारी गौतम गंभीरने या संघटनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि स्वतःची तसंच त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षा पुरवा अशी मागणी केली.
गौतम गंभीरची पहलगाम हल्ल्यावर कडाडून टीका
पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गौतम गंभीर यांनी कठोर शब्दांत निंदा केली होती. त्यानंतर गौतम गंभीरला ही धमकी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे गौतम गंभीर सध्या टीम इंडियापासून ब्रेकवर आहे. अलीकडेच तो त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. पण पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर त्याला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
आयपीएलनंतर टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावेळी गौतम गंभीर पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी, गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. मात्र WTC फायनलसाठी पात्र ठरण्यास भारतीय संघाला अपयश मिळाले होते.
पाच सामन्यांची कसोटी मालिका लवकरच
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका जून ते ऑगस्ट दरम्यान होईल. इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी करणे आणि ती जिंकणे यावरच गंभीरचे लक्ष असणार आहे.