Dr. Manmohan Singh Dies at 92: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळासोबतच कलाविश्व व अर्थविश्वातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही अनेक देशांच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या आपल्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे एक प्रगाढ विद्वत्तेचा मितभाषी आणि मृदू स्वभावाचा व्यक्ती गमावल्याची भावना सगळ्यांकडूनच व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९१ पासून झाली सुरुवात…

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये १९९१ च्या सुधारणांचा उल्लेख सर्वप्रथम केला आहे. “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशा वेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं”, असं राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

मनमोहन सिंग यांचं ‘ते’ विधान

आर्थिक सुधारणा राबवताना मनमोहन सिंग यांनी संसदेत केलेला एक उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. “जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं. “no power on earth can stop an idea whose time has come” (ज्या कल्पनेची वेळ आलेली असते, तिला पृथ्वीवरची कोणतीही शक्ती अस्तित्वात येण्यापासून रोखू शकत नाही). थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!

“इतिहास माझा सह्रदयतेनं विचार करेल”

“पुढे मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना ते एक वाक्य म्हणाले होते, ‘I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ‘, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच”, असंही राज ठाकरेंनी पुढे म्हटलं आहे.

“डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही”, असा सूचक उल्लेखही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या शेवटी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pm manmohan singh dies mns chief raj thackeray shares post pmw