GN Saibaba Passed Away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांचे आज (१२ ऑक्टोबर) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू होते. जी एन साईबाबा यांच्या पित्ताशयावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते.

जी एन साईबाबा यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना १० दिवसांपूर्वी निम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्पेसने दिलं आहे.

हेही वाचा : Mehsana Wall Collapses : गुजरातमध्ये भिंत कोसळून ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भिती

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना ९ मे २०१४ रोजी मावोवादी गटाशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी त्यांच्या घरातून त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर मावोवादी गटाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, जीएन साईबाबा यांचे पूर्ण नाव गोकरकोंडा नागा साईबाबा असे आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथील आहेत. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन.साईबाबा यांच्यावर ते नक्षलवाद्यांचे मास्टर माइंड असल्याचा पोलिसांचा आरोप होता.

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा.साईबाबा यांना गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर सत्र न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांखाली अटकेची कारवाई झाल्यानंतर जी.एन.साईबाबा आणि इतर पाच जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं साईबाबा व त्यांच्यासह इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

साईबाबांवर काय आरोप होते?

मार्च २०१७ मध्ये गडचिरोलीतील सत्र न्यायालयाने साईबाबा व इतर आरोपांना नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या व त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. साईबाबा व इतर दोन आरोपांकडे भूमीगत नक्षलवाद्यांना वितरीत करण्यासाठीचं साहित्य सापडल्याचं न्यायालयानं मान्य केलं. तसेच, यातून लोकांना हिंसक कारवायांसाठी भडकवण्याचा हेतू असल्याची बाबही सत्र न्यायालयानं मान्य केली होती.