प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी दोघा भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याप्रकरणी भाजपने तीव्र संताप व्यक्त केल्याने सरकारने या उतावीळपणाविरुद्ध सबुरीचा सल्ला दिला आहे.
व्यावसायिक लष्कर नियमांचे काटेकोरपणे पालन करतात त्यामुळे या स्थितीला युक्तीने प्रतिसाद देता येईल उतवीळपणाने नव्हे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी ट्विट केले आहे.
शिरच्छेद करण्यात आलेल्या हेमराज या जवानाचे शीर पाकिस्तान देत नसेल तर त्यांच्या १० सैनिकांची मुंडकी आणा, अशी संतप्त प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे तिवारी यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्यासह हेमराजच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर स्वराज यांनी, कोणतीही प्रतिक्रिया न देता आपण स्वस्थ बसावयाचे आणि चर्चा करीत राहावयाचे का, असा सवाल केला. त्यामुळेच सरकारने ठोस उपाय करण्याची गरज आहे, असे आमचे म्हणणे आहे, असेही स्वराज म्हणाल्या.
भारतीय जवानांना अत्यंत अमानुष वागणूक देण्यात आली त्याबद्दल प्रत्येक देशवासीयाच्या मनात संताप आहे. भारताने त्याबाबत केवळ संतापच व्यक्त केलेला नाही तर हा कलाटणी देणारा मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले आहे, असेही तिवारी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governamen gives advice to bjp for waiting