राजस्थानमधील भरतपूर येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर अनेकवेळा ट्रक्टर फिरवून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. राजस्थानध्ये पुढील महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या घटनेचा राजकारणाशी संबंध जोडला जात असून विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसवर यानिमित्ताने टीका करण्याची संधी साधली आहे. काँग्रेसच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती रसातळाला गेली असल्याची टीका प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने केली आहे. भाजपाने या घटनेचा संबंध थेट इसिस या दहशतवादी संघटनेच्या कृत्यांशी लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरपत गुर्जर या ३० वर्षीय युवकाची त्याच्याच दामोदार नावाच्या भावाने ट्रॅक्टरखाली चिरडून अतिशय क्रूरपद्धतीने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी स्थानिक गावकरी दोन भावांच्या भांडणात पडून ते सोडविण्याऐवजी मोबाइलवर या घटनेचे चित्रण करत होते. दोन भावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादातून सुरू असलेला भांडणामध्ये एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. भाजपाचे खासदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ही घटना इसिस या दहशतवादी संघटनेसारखी असल्याची तुलनाही त्यांनी केली.

राज्यवर्धन राठोड म्हणाले, ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये गुन्हा घडला त्यावरून इसिसची झलक दिसते. राजस्थानचे युद्ध क्षेत्र झाले आहे का? हे आताच रोखले नाही, राजस्थान गुन्ह्यांना संरक्षण देणारे राज्य बनेल. गेल्या काही काळापासून राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. अशा घटना एकतर इसिसच्या राज्यात होऊ शकतात किंवा राजस्थानमध्ये. मी इशारा देऊ इच्छितो की, अशा लोकांनी ३ डिसेंबरपूर्वी राजस्थानमधून निघून जावे.

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार असून निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. विद्यमान सत्ताधारी काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर भाजपाला सत्ता काबिज करायची आहे. राज्यवर्धन राठोड यांनी राज्यातील गुन्हेगारांना ३ डिसेंबरची जी वर मुदत दिलेली आहे. ती निकालाच्या तारखेच्या अनुषंगाने त्यांनी दिली असल्याचे कळते.

मला आश्चर्य वाटते अशा गुन्हेगारांना प्रेरणा कुठून मिळते. तर या गुन्हेगारांना राज्याच्या मंत्र्यांकडूनच प्रेरणा मिळते. हे मंत्री विधानसभेत म्हणतात, “हा मर्दांचा प्रदेश आहे”. संसदीय कार्य मंत्री शांती धारीवाल यांनी मागच्यावर्षी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देऊन राठोड यांनी काँग्रेसवर टीका केली. विधानसभेत बोलत असताना धारीवाल यांनी म्हटले की, बलात्कारामध्ये राज्य प्रथम क्रमाकांवर आहे. त्यानंतर या विषयाला जोडून त्यांनी राजस्थान मर्दांचा प्रदेश असल्याचे विधान केले. ज्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली.

दरम्यान भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही या घटनेचा निषेद केला. ते म्हणाले, सर्व काँग्रेसशासित राज्यात अशीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी राजस्थान दौऱ्यात भरतपूरला भेट द्यावी, असेही आवाहन पात्रा यांनी केले. “प्रियांका गांधी राजस्थानमध्ये प्रचारासाठी जात आहेत. तेव्हा त्यांनी भरतपूरचाही दौरा करावा आणि जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना निलंबित करावे. प्रियांका गांधी फक्त भाषणबाजी करत नाहीत, तर त्यांच्यामध्ये कारवाई करण्याची धमक आहे, हे यातून त्यांनी दाखवून द्यावे. त्यांच्यामध्ये भूमिका घेण्यासाठी कणा आहे का? हे आम्हाला पाहायचे आहे”, अशा शब्दात पात्रा यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांना आव्हान दिले.

राजस्थानमधील भाजपाचे नेते गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, भरतपूरमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. काँग्रेस सरकारला लाज वाटली पाहीजे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांना हाताळता आली नाही.

भरतपूरमधील प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली असून पोलिस घटनेचा आणखी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt in rajasthan run like isis regime criticism of bjp over the incident of being crushed under tractor kvg
Show comments