नवी दिल्ली : गुजरातमधील मोरबी येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा तपास व संबंधित इतर पैलूंवर वेळोवेळी लक्ष ठेवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाला दिले. या दुर्घटनेत १४० हून अधिक जण मृत्युमुखी पडले होते. त्यात ४७ मुलांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेवर आधीच सुनावणी घेतली आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका जनहित याचिकाकर्त्यांला व या दुर्घटनेत आपले दोन नातलग गमावलेल्या अन्य एका याचिकाकर्त्यांला या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी दिली. या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी आणि आप्त गमावलेल्या कुटुंबीयांना पुरेशी नुकसानभरपाई मिळावी ही याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat bridge disaster investigation supreme court direction to the high court ysh