हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर भाजपाने हरियाणात तिसऱ्यांना सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले. दरम्यान, या विजयानंतर आता भाजपाने राहुल गांधी यांच्या घरी थेट जिलेबी पाठवली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हरियाणा भाजपाने यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर या चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेसने भाजपाला डिचवण्याचा केला होता प्रयत्न

खरं तर हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. मंगळवारी मतमोजणी सुरु झाल्यानंतर आधी काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला या जिलेबी संदर्भातील पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही वेळानंतर भाजपा सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्य़ांनीही जल्लोषात जिलेबी वाटत काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना जिलेबी भरवत आनंद साजरा केला होता.

हेही वाचा – Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”

हरियाणा भाजपाने शेअर केला स्क्रीनशॉट

अशातच आता स्विगीवरून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जिलेबी पाठवली असल्याचा एक्स स्क्रीनशॉट हरियाणा भाजपाने शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय निवडला असल्याचेही दाखवण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे हा स्क्रीनशॉट खरा की खोटा याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र, अशाप्रकारे स्क्रीनशॉट शेअर करून काँग्रेस आणि राहुल गांधी यांना पुन्हा डिचवण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. भाजपाची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सोशल मीडियावर जिलेबी ट्रेंड का होऊ लागली?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत राहुल गांधी यांनी गोहानामध्ये लोकप्रिय असलेल्या जिलेबी दुकानाचे मालक स्वर्गीय लाला मतुराम हलवाई यांचा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मतुराम हलवाई यांच्या जिलेबीचा बॉक्स दाखवला होता.

हेही वाचा – Priyanka Gandhi : “महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार”, व्हिडीओ शेअर करत प्रियांका गांधींचा महायुतीला इशारा

गोहाना येथे निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मतुराम हलवाई यांनी बनवलेल्या जिलेबीचा बॉक्स दाखवत म्हटलं होतं की, देशभर विकली गेली पाहिजे आणि निर्यातही झाली पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. त्यामुळे या मिठाईच्या दुकानाचे कारखान्यात रूपांतर होऊन २० ते २५ हजार लोक काम करू शकतील, असं सांगत देशात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकांचे कशा पद्धतीने नुकसान होते, असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. त्यामुळे जिलेबीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होऊ लागली.