Hathras Accident Updates : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १२१ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संत्सगाचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा अद्यापही फरार आहे, असं उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी सांगितले असल्याचे वृत्त हिंदूस्थान टाईम्सने दिले आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत ‘मुख्य सेवेदार’ असलेले देवप्रकाश मधुकर आणि चेंगराचेंगरी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आम्हाला भोले बाबा कॅम्पसमध्ये सापडले नाहीत. ते येथे नाहीत”, असं पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार म्हणाले. दुपारी ३.३० च्या सुमारास भोले बाबा कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असतानाच चेंगराचेंगरी झाली होती. त्यांची गाडी बाहेर पडल्यानंतर त्या कारच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन ११६ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.

हेही वाचा >> Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?

अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असण्याची शक्यता सिंकंदररावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तविली. आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडच्या विभागीय आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. महिला व मुलांसह भाविकांच्या मृत्यूचे वृत्त हृदयद्रावक आहे. मृतांच्या नातलगांप्रती सहवेदना व्यक्त करते, असे राष्ट्रपतींनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले आहे.

मृतदेहांचा खच पाहून पोलिसाला हृदयविकाराचा झटका

या सत्संगाच्या बंदोबस्तासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात करण्यात आली होती. मात्र ही चेंगराचेंगरी आणि मृतदेहांचा खच पाहून क्यूआरटी पथकातील पोलीस शिपाई रवी यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव मृतदेहांची व्यवस्था करत असताना त्यांनी एकाच वेळी इतके मृतदेह पाहिल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.