Hathras Stampede Updates : हाथरस दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर, पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

आयोजन समितीच्या सेवेकरी आणि सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सत्संगसाठी गर्दी आणि देणगी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती, असं त्यांनी पोलीस चौकशीत स्पष्ट केलं आहे.

बॅरिकेडिंग करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत होते. कार्यक्रमस्थळी सूर्यप्रकाशाची व्यवस्था, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था, साफसफाई आदी सर्व कामे सेवेदार पाहत होते. या कार्यक्रमासाठी त्यांना गणवेशही देण्यात आले होते. गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी महिला आणि पुरुषांना काळ्या कमांडोचे कपडे दिले होते. तर, काही सेवेकऱ्यांना गुलाबी रंगाचा ड्रेस दिला होता. तसंच, भोले बाबांच्या पायाखालची माती कपाळावर लावल्यास अनेक समस्या दूर होतात, अशी समजूत त्यांच्या अनुयायांमध्ये असल्याचं सेवेदारांनी चौकशीदरम्यान सांगितलं.

बाबांच्या ताफ्याला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी सेवेकरी त्यांच्या मागे धावले. गर्दी अनियंत्रित होती. त्यामुळे महिला आणि मुले एकमेकांच्या अंगावर पडले. ही घटना घडताच सेवेकरी घटनास्थळ सोडून निघून गेले, असंही पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. दरम्यान, राम कुमार, उपेंद्र, मेघ सिंह, मंजू यादव, मुकेश कुमार आणि मंजू देवी या आरोपींची ओळख पटवल्याची माहिती पत्रकार परिषेदत पोलिसांनी दिली.

हेही वाचा >> Hathras Stampede : मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर; डॉक्टर म्हणाले, “छातीत..”

शवविच्छेदन अहवालही आला समोर

मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालानुसार छातीच्या पोकळीत रक्त साचल्याने, श्वासोच्छवास आणि बरगडीच्या जखमांमुळे लोकांचा मृत्यू झाला. मथुरा, आग्रा, पिलीभीत, कासगंज आणि अलीगढ येथून २१ मृतदेह एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. येथे डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केलं. मृतदेह येताच मंगळवारी रात्रीपासून मृतांच्या नातेवाईकांनी शवागरात गर्दी करण्यास सुरुवात केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.”

हेही वाचा >> Hathras Stampede : “मृतांना जिवंत करणार अन् आजारांना पळवणार”, भोले बाबांबाबत अनुयायांनी केलेले दावे चर्चेत!

एफआयआरमध्ये काय?

दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. भोलेबाबा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते. त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे. अधिकाधिक नागरिक महाराजांच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्यावर परिस्थिती गंभीर झाली. बाबाच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मागे ढकलले. त्यामुळे काही नागरिक खाली पडले. खुल्या मैदानात जाण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले. यातून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मैदान निसरडे असल्याने नागरिक घसरून पडले. जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.