पीटीआय, हाथरस हाथरस येथे भाविकांच्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांची संख्या १२१ झाली आहे. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर व इतरांची नावे यामध्ये आहेत. मात्र संशयितांमध्ये भोलेबाबाचे नाव नाही. त्याच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. कार्यक्रम संपवून भोलेबाबा वाहनाने जात असताना भाविकांनी धूळ माथ्याला लावण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. भोलेबाबाच्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना ढकलले, त्यातच पावसाने निसरडे असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी ८० हजार जणांना परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात अडीच लाख नागरिकांनी येथे हजेरी लावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. हेही वाचा >>>ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, आठवड्याभरात दुसऱ्यांदा प्रकृती खालावली सर्वोच्च न्यायालयात याचिका या घटनेची पाच जणांच्या तज्ज्ञ समितीकडून चौकशी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.