कोची : कुवेतमधील एका बहुमजली इमारतीला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या ४५ भारतीयांपैकी ३१ जण दक्षिणेतील राज्यांतील असून त्यांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी विमानाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यासह केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांनी येथे मृतांना श्रद्धांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुवेत आगीत ठार झालेल्या भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. भारतीय हवाई दलाच्या सी-१३०जे वाहतूक विमानाने ४५ पैकी ३१ भारतीयांचे मृतदेह येथे उतरवण्यात आले. यानंतर विमान इतर १४ भारतीयांचे मृतदेह घेऊन दिल्लीला रवाना झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुवेतच्या आगीत मरण पावलेल्या दक्षिणेतील ३१ लोकांमध्ये केरळमधील २३, तमिळनाडूतील सात आणि कर्नाटकातील एकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी येथील विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, अनिवासी भारतीय हे केरळची जीवनरेखा आहेत आणि आगीत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी मृत्युमुखी पडणे ही ‘देशासाठी मोठी आपत्ती’ आहे. ही घटना स्थलांतरित समाजासाठीही मोठी आपत्ती असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>> गैरप्रकार खपवून घेणार नाही! ‘नीट’वरील वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा

कुवेतच्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या आपल्या प्रियजनांचे मृतदेह घेण्यासाठी शोकग्रस्त कुटुंबे शुक्रवारी कोची विमानतळावर जमले होते. शवपेट्या एक एक करून बाहेर काढल्या जाऊ लागल्यावर तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रियजनांनी हंबरडा फोडला.

आणखी एकाचा मृत्यू

कुवेतमध्ये लागलेल्या भीषण आगीत आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर भारतीयांचा मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गार्डच्या खोलीत ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत आता एकूण ५० जणांचा मृत्यू झाला.

काँग्रेसची केंद्रावर टीका

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांना कुवेतला जाण्याची परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाचे समर्थन केले. खान म्हणाले की, शुक्रवारी मृतदेह आणण्यात येणार होते, त्यामुळे वीणा यांनी गुरुवारी तिथे जाऊन काय केले असते? तर मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, जखमींवर उपचार आणि मृतांचे मृतदेह आणण्यासह मदतकार्यात मदत करण्यासाठी राज्य सरकारने जॉर्जना कुवेतला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartbreaking situation at kochi airport as the bodies of 31 indians arrive zws