होळीचा सण देशभर उत्साहात साजरा केला जातो. या होळी सणाच्यानिमित्ताने शहरात राहणारे नोकरदारवर्ग आपल्या गावी परतात आणि दोन-तीन दिवस चालणाऱ्या रंगांची उधळण करणाऱ्या सणाचा आनंद लुटतात. आज देशभर होळी साजरी होत असताना गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. धुळवडीच्या निमित्तान अनेकजण आपल्या गावी परतत आहेत. याकरता रेल्वे प्रशासनाने तब्बल १२०० होळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. तसंच, गैरप्रकार आणि अपघात रोखण्याकरता चोख व्यवस्थाही केली गेली आहे.

होळीनिमित्त भारतीय रेल्वेच्या दिवसभर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने यासाठी १२०० विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. यामध्ये राखीव होळी विशेष गाड्या आणि अनारक्षित होळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, रेल्वेने अधिक बर्थ निर्माण करण्यासाठी आणि प्रवाशांना सामावून घेण्यासाठी विविध नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच वाढवले ​​आहेत. तसंच, या गर्दीच्या प्रवासाच्या काळात, रेल्वे मंत्रालयाने सुरळीत कामकाज आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवल्या आहेत.

प्रतिक्षा करण्यासाठी खास जागा

रेल्वे स्थानकांवर रेल्वेची वाट पाहण्याकरता प्रवाशांना सोयीचं जावं याकरता जागा ठरवण्यात आल्या आहेत.

रांग व्यवस्थापन

सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी चोख रांग व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली

प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त व्यावसायिक कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचारी तैनात आहेत.

वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचा

शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना स्टेशनवर वेळेवर पोहोचण्याचा सल्ला भारतीय रेल्वेने दिला आहे. वेळेवर पोहोचल्याने बोर्डिंग प्रक्रिया सुरळीत होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी होईल. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटे आणि ओळखपत्रांसह प्रवास करण्याचे आवाहनही रेल्वेने केले आहे.