हैदराबाद : तेलंगणातील श्रीशैलम डावा किनारा कालवा (एसएलबीसी) प्रकल्पाच्या खचलेल्या बोगद्यात अडकलेल्या आठ मजुरांच्या सुटकेची आशा धूसर झाली आहे.
बचाव पथकाचे कार्य सुरू असतानाच पाणी आणि चिखल गळतीमुळे प्रचंड पेच निर्माण झाला आहे. बोगदा खचल्यानंतर शनिवारपासून आठ मजूर येथे अडकलेले आहेत. ादरम्यान, चिखल साचल्यामुळे पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी तूर्तास कोणतेही तंत्रज्ञान नसल्याची माहिती एनडीआरएफच्या १०व्या बटालियनचे कमांडंट प्रसन्न कुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नौदल, लष्कर आणि इतर संघटनांसोबत प्रदीर्घ बैठक घेतल्यानंतर, घटनास्थळी उपस्थित कोणताही तज्ज्ञ चिखलाची भिंत ओलांडून अडकलेल्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे हे सुचवू शकले नाही. शनिवारी सकाळी बोगद्याच्या १३.५ किलोमीटर आत छताचा एक भाग कोसळून सुमारे ६० तास उलटले आहे.
तीक्ष्ण धातूमुळे चिंता
चिखलात तीक्ष्ण धातू, काँक्रीटचे तुकडे अन्य सामग्री असल्याची माहितीही त्यांनी दिली. जो कोणी या बोगद्यात जाईल तो निश्चितच जखमी होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. एक ‘रॅट वर्कर’ मदतीला आला परंतु तो कोरड्या परिस्थितीतच काम करू शकतो, असे ते म्हणाले.
संकटाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान नाही
बोगद्यात चिखल-पाणी मिश्रणाच्या जाड भिंतीचे संकट असून सध्या आमच्याकडे असे कोणतेही तंत्रज्ञान नाही जे आम्हाला ही मातीची भिंत ओलांडून पीडितांपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकेल, असे कुमार म्हणाले. तसेच अद्याप अडकलेल्या लोकांशी संपर्क स्थापित करू शकलो नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. येथे ५८४ कुशल कर्मचाऱ्यांच्या पथकाने निरीक्षणही केले होते, परंतु यश आले नाही.