लोकसभा निवडणूक सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी होत आला आहे. आणखी १५ दिवसांनी शेवटचा टप्पा पार पडेल. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यापासूनच प्रत्येक वळणावर निवडणुकीतील विषय बदलत गेले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपा आणि मोदींनी “अब की बार ४०० पार”चा नारा दिला. नंतर मात्र त्याचा उल्लेख टाळला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधान बदलाच्या चर्चांमुळे हा नारा सोडला. तसेच भाजपाने २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडली. पण, एवढ्या लांबचा धीर मतदारांमध्ये नसल्याचे पाहून ही घोषणाही मागे पडली. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी थेट मुस्लीम समाजाला लक्ष्य केले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राजस्थानमधील प्रचारसभेत बोलताना मोदींनी मुस्लिमांना घुसखोर संबोधले. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हिंदू महिलांचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल आणि अधिक मुले असणाऱ्यांना दिले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मात्र मी मुस्लिमांच्या घरात वाढलो, एकत्र ईद साजरी केली, असे म्हणण्यापर्यंत परिस्थिती कशी बदलत गेली याचा घेतलेला हा आढावा.

१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २१ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मुस्लीम समाजाला लक्ष्य केले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या जाहीरनाम्याची चर्चा बाजूला पडून हिंदू-मुस्लीम विषय केंद्रस्थानी आला. पुढे अलीगढ येथील एका सभेत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले. “काँग्रेसचे सरकार आल्यास ते माता-भगिनींच्या सोन्याचा हिशेब करतील आणि मग ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारने म्हटले होते की, देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. ही अर्बन नक्षल विचारधारा तुमचे मंगळसूत्रही वाचू देणार नाही”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

जागतिक माध्यमांनी घेतली गंभीर दखल

साहजिकच पंतप्रधानांच्या विधानांवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केलीच, त्याशिवाय जागतिक माध्यमांनीही याची गंभीर दखल घेतली. द वॉशिंग्टन पोस्टने म्हटले, “स्वातंत्र्यानंतर भारतातील नेत्यांनी देशाला धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृतिक लोकशाहीच्या मार्गावर नेले होते; पण मोदींच्या पक्षाने या सर्वांच्या विपरित असा हिंदू दृष्टिकोन रेटला आहे. मोदींच्या काळात अल्पसंख्याकांवर लज्जास्पद असे हल्ले होत आहेत.”

न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले, भारतातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समाजाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरलेली थेट भाषा ही त्यांच्या जागतिक मंचावरील प्रतिमेशी विसंगत अशी आहे.

सीएनएन वृत्तसंस्थेने म्हटले की, मोदींचे विधान भाजपाच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेला आणखी बळ देणारे आहे. त्यामुळे या फुटीरतावादी विधानावर विरोधकांनी टीका केली आहे. तसेच गेल्या दशकभरात मोदी आणि भाजपाने हिंदू राष्ट्रवादी धोरण राबविताना धार्मिक ध्रुवीकरण केल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे, ज्यामुळे भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात इस्लामोफोबिया आणि अतिशय टोकाचा असा जातीय संघर्ष निर्माण झालेला दिसतो.

मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण…

निवडणूक आयोगाकडे तक्रार

पंतप्रधान मोदींनी मुस्लिमांना घुसखोर म्हटल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली. संविधान बचाओ नागरिक अभियान या संस्थेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारीचे पत्र पाठविण्यात आले, अशी बातमी स्क्रोलने दिली. १७,४०० लोकांनी या पत्राखाली स्वाक्षरी देऊन पाठिंबा दिल्याचा दावा या बातमीत करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे उल्लंघन करणारे विधान केले आहे. तसेच हिंदू आणि मुस्लीम समुदायाला एकमेकांविरोधात भडकविण्याची चिथावणी दिल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला.

“काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हिंदू महिलांकडे असलेल्या सोन्याची गणती करून ते मुस्लीम समाजाला वाटण्याबाबतचा कोणताही उल्लेख नसतानाही पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून असत्याचा प्रचार करत आहेत”, असाही आरोप या पत्राद्वारे करण्यात आला. या पत्राशिवाय २,२०९ लोकांनी स्वाक्षरी केलेली एक याचिकाही दाखल झाली. या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्यात आले की, पंतप्रधान मोदी मते मिळविण्यासाठीच मुस्लीम समुदायाबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करत आहेत. भारताला जगभरात लोकशाहीची जननी असे संबोधले जाते. मात्र, मोदींच्या या विधानामुळे भारताची प्रतिमा मलीन होत आहे.

‘हिंदूंची लोकसंख्या घटली’, पंतप्रधानांच्या समितीचा अहवाल; तर मुस्लीमांची लोकसंख्या…

आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालामुळे गोंधळ

पंतप्रधान मोदींनी मुस्लीम समुदायाबद्दल विधान करत असतानाच आर्थिक सल्लागार परिषदेने प्रसिद्ध केलेल्या भारतातील धार्मिक लोकसंख्येच्या अहवालामुळे गोंधळात भर पडली. अहवाल प्रसिद्ध करण्यास हीच वेळ का साधण्यात आली, असे प्रश्न उपस्थित केले गेले. या अहवालातील माहितीनुसार, १९५० ते २०१५ या काळात भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत ७.८ टक्क्यांची घसरण दिसून आल्याचे म्हटले आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा १९५० साली ८४ टक्के इतका होता, तो २०१५ साली कमी होऊन ७८ टक्क्यांपर्यंत कमी झाला; तर मुस्लीम धर्मीय लोकसंख्येचा वाटा १९५० साली ९.८४ टक्के इतका होता. मात्र, त्यामध्ये आता वाढ होऊन ही संख्या १४.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे, असेही अहवालात म्हटले गेले.

मी ताजियाच्या मिरवणुकीत सहभागी झालो – मोदी

महिनाभर मुस्लीम समुदायाविरोधात विधाने केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चौथ्या टप्प्यानंतर अचानक भूमिकेत बदल केला. १४ मे रोजी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर न्यूज १८ वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. गंगा नदीत एका बोटीवर ही मुलाखत देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी कधीही हिंदू- मुस्लीम केले नाही. ज्या दिवशी मी असे करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यास लायक राहणार नाही.

“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

एवढेच नाही तर मोदी पुढे म्हणाले, “मी लहानपणापासून मुस्लीम कुटुंबाबरोबर वाढलो. मी जिथे राहायचो, त्याच्या आजूबाजूला अनेक मुस्लीम कुटुंबं राहत असत. ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण होत नसे, आमचे जेवण मुस्लीम कुटुंबाकडून यायचे. ज्यावेळी मोहर्रमचा ताबूत निघायचा, तेव्हा आम्ही ताजियाच्या खालून चालायचो. मी लहानपणापासून मुस्लीम कुटुंबाबरोबर वाढलो. मात्र, २००२ नंतर माझी प्रतिमा डागाळण्यात आली.”

राजस्थानमध्ये जे विधान केले, त्यावरही पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीमध्ये भाष्य केले. राजस्थानमध्ये आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेसचे लोक भारतीय नागरिकांची संपत्ती अधिक मुले असणाऱ्यांना वाटतील, असे मी बोललो असलो तरी ते मुस्लीम असतील, असे मी बोललो नाही. भारतातील गरीब कुटुंबात अधिक मुले असतात, असे मला सुचवायचे होते, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी दिले. एकूणात, सुरुवातीस मुस्लीम समाजावर आरोप करणाऱ्या मोदींनी निवडणुकीच्या नंतर टप्प्यात मात्र घुमजाव केलेले दिसते.

Live Updates