देशाची अर्थव्यवस्था, नोटाबंदी आणि जीएसटीवरून टीका सहन करणाऱ्या अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. भ्रष्टाचार, काळा बाजार रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले. यूपीए सरकारला ‘धोरण लकवा’ झाला होता त्याचमुळे देशाचे नुकसान झाले, ज्यातून देशाला सावरण्यासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजून मी माजी अर्थमंत्री झालो नाही त्यामुळे आजच्या घडीला मी स्तंभलेखक होणार नाही, असे म्हणत त्यांनी यशवंत सिन्हा यांना टोला लगावला. इतकेच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मी काही निर्णय लवकर घेतले आणि त्याचमुळे माझ्यावर टीका होत आहे, असेही जेटलींनी म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करताच माझ्यावर टीकेचे ताशेरे झाडण्यात आले. नोटाबंदीनंतर जीएसटी लागू करण्यासाठी मी घाई का केली? हा अनेकांचा मुद्दा होता. मात्र महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागले. असेही जेटली यांनी म्हटले आहे. ‘इंडिया@70 मोदी@3.5’ या पुस्तकाचे प्रकाशन आज अरूण जेटलींच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले याच कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेक निर्णायक पावले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत. देशाच्या जनतेचे हित या निर्णयांमध्ये सामावले आहे. जीएसटी लागू करण्यासंदर्भातले निर्णय हे सर्वसहमतीने घेण्यात आले आहेत. डायरेक्ट टॅक्स गेल्यावर्षीच्या तुलनेत १५.७ टक्के जास्त आला आहे. राजकीय पक्षांना मिळणारा निधीही पारदर्शक व्यवहारांच्या निकषांमध्ये यावा यासाठी आम्ही काम करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत पक्षालाच घरचा आहेर दिला होता. मात्र त्यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका करत जेटलींनी प्रत्युत्तर दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont have the luxury of being a former finance minister say arun jaitley