अंगावर वीज कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास छत्तीसगडच्या राजनंदगावात ही घटना घडली. सर्व सहा विद्यार्थी ११ वीत शिकत असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेनंतर छत्तीसगड सरकारने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व सहा विद्यार्थी ११ वीत शिकत असून ते आज परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. परीक्षा देऊन घरी परतत असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एका झाडाच्या बाजुला असलेल्या शेडखाली थांबण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांशिवाय इतर दोन नागरिकांनीही याठिकाणी आसरा घेतला. मात्र, काही वेळात या ठिकाणी वीज कोसळली. या घटनेत सर्व विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही देण्यात आली. यासंदर्भात पीटीआयशी बोलताना, प्राथमिक तपासानुसार, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण किरकोळ जखमी आहे. यात सहा विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी ११ वीत शिकत होते. या घटनेनंतर छत्तीसगड सरकारने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, अशी माहिती राजनंदगावचे पोलीस अधिक्षक मोहित गर्ग यांनी दिली.

दरम्यान, द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी छत्तीसगडच्या जहांगीर चंपा जिल्ह्यात सात जणांच्या बाजुला वीज कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच इतर सहा जण जखमी झाले होते. हे सातही जण पिकनिकसाठी गेले होते. पिकनिकवरून परतत असतान अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी एका झाडाच्या खाली थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने काही वेळात त्यांच्या बाजुला वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला.