विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही, हत्या करून तरुणाचा मृतदेह गावातील झाडाला लटकवल्याचंदेखील पुढे आलं आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने शेजारी राहणाऱ्या एका तरुणाबरोबरचा फोटो तिच्या पतीला दाखवला होता. त्यानंतर दोघांमध्येही वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की महिलेच्या पतीने तिला घरातून बाहेर काढत माहेरी जाण्यास सांगितले.
हेही वाचा – काळ्या पिशवीतून येणारी दुर्गंधी नि घोंघावणाऱ्या माशा; डायपर घातलेल्या चिमुरड्याची घृणास्पद हत्या
मृतक तरुणामुळे आपल्या मुलीला माहेरी यावं लागलं या रागातून महिलेच्या माहेर लोकांनी शुक्रवारी या तरुणांचे अपहरण केले. तसेच त्याची हत्या करत मृतदेह गावातील शाळेच्या प्रांगणातील एका झाडाला लटकवला. तरुणांचे अपहरण झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा मृतदेह शाळेच्या प्रांगणातील झाडावर लटकला असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर तरुणांच्या घरच्यांनी तसेच काही ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर धरणा प्रदर्शन सुरु केले. जोपर्यंत आरोपीला पकडलं जात नाही आणि मृतक तरुणाच्या परिवाराला आर्थिक मदत दिली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ग्रामस्थांचा वाढता रोष बघता राजस्थान पोलिसांनी महिलेच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – आत्महत्त्येचा बनाव बेतला जीवावर; घरातील भांडण शमवणाऱ्या लोको पायलटचा जागीच मृत्यू
यासंदर्भात मृतक तरुणाचे काकांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या पुतण्याचे गावातील महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वीसुद्धा महिलेच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली होती. हे प्रकरण ग्राम पंचायतमध्येदेखील पोहोचलं होतं. मात्र, त्यानंतरही त्याला सातत्याने धमकी दिली जात होती. आता तर त्याची हत्या करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
© IE Online Media Services (P) Ltd