Congress Leader on India Alliance : इंडिया आघाडीतील घटकपक्ष आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवल्या. त्यामुळे या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या असून काँग्रेसला सलग तीन टर्ममध्ये खातंही उघडता आलं नाही. दरम्यान, इंडिया आघाडी मजबूत असून पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी एकत्र येईल, असा विश्वास काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्ला यांनी स्पष्ट केले की इंडिया आघाडीची स्थापना प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक पक्षाला राज्यस्तरीय निवडणुकीत स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली होती. “जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना झाली, तेव्हा असे ठरले होते की आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढणार आहोत आणि राज्यांमध्ये पक्ष स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. जेव्हा संसदीय निवडणुका होतील, तेव्हा इंडिया आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होईल”, असं ते म्हणाले. “विरोधी पक्षांमधील एकता अबाधित आहे आणि तशीच राहील”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मतविभाजनामुळे आपचा पराभव नाही

दिल्ली निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकून ‘आप’ची दशकभराची सत्ता संपुष्टात आल्यानंतर ते असं म्हणाले. ‘आप’ला फक्त २२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसने ‘आप’च्या मतांचे विभाजन केले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावला का, असे विचारले असता, शुक्ला यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि म्हटले की मतविभाजन प्रत्येक निवडणुकीत होते. “निवडणुकीदरम्यान प्रत्येकाची मते कापली जातात. त्यामुळे निवडणुकीत एका पक्षाने दुसऱ्या पक्षासाठी मते कापली असे म्हणणे अयोग्य आहे”, असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि आप यांनी दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली. तथापि, दोन्ही पक्षांनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत एकटे लढण्याची घोषणा केली, परंतु या निर्णयाचा दोघांनाही फायदा झाला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India alliance united will come together loksabha elections says congress sgk