India China Border : गेल्या चार ते पाच वर्षांपासून पूर्व लडाखमधील सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. मात्र, दोन्ही देशांमधील हा तणाव कमी करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. आता चीन आणि भारत पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील तणाव संपवण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने लडाखमधून सैन्य मागे घेण्यासंदर्भात चीनने सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, चर्चेच्या माध्यमातून चीन (China) आणि भारतामधील (India) मतभेद कमी करण्यास सहमती देण्याबरोबरच एकमेकांशी संवाद मजबूत करण्यास आम्ही सहमती दर्शवू. तसेच दोन्ही देशांना स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचे आम्ही मान्य करतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. यासंदर्भात चीनच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

हेही वाचा : Communal Clash : डेहराडून रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुलाच्या भेटीनंतर दोन समाज भिडले; तुंबळ हाणामारीनंतर दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झियाओगांग यांनी चीनमधील भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत यांची भेट घेतली. यावेळी झांग झियाओगांग यांनी म्हटलं की, “भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील (Ladakh) नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशामधील प्रलंबित मुद्द्यांवर मतभेद कमी करण्यासाठी आणि संवाद मजबूत करण्याबरोबरच काही सहमतीस करण्यास सक्षम आहेत”, असं त्यांनी म्हटलं. तसेच दोन्ही बाजूंनी शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचेही प्रयत्न असल्याचे झांग झियाओगांग यांनी स्पष्ट केलं.

“पूर्व लडाखमधील चार वर्षांहून अधिक काळ दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष सुरू आहे. हा लष्करी संघर्ष संपवण्यासाठी आणि दोन्ही देशांदरम्यान डेमचोक आणि डेपसांगमधून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा सुरू आहेत. या वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते”, असंही चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झियाओगांग यांनी म्हटलं.

यावेळी चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S.Jaishankar) आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठक तसेच रशियातील ब्रिक्स बैठकीच्या वेळी वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला. जयशंकर यांनी म्हटलं होतं की, “नियंत्रण रेषेसंदर्भात स्पष्ट करार आहे. मात्र, असं असूनही आम्ही २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात पाहिलं की, चीनने सर्व करारांच उल्लंघन केलं. मोठ्या संख्येने सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेले, ज्याला आम्ही त्याच प्रकारे उत्तर दिले.”