India Rejects USCIRF Report on Religious Freedom : अमेरिकन सरकारने नेमलेल्या आयोगाने (यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम – यूएससीआयआरएफ) आंतराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीचा अहवाल नुकताच सादर केला आहे. मात्र, हा अहवाल पाहून भारताने संताप व्यक्त केला आहे. भारताने हा अहवाल ठामपणे नाकारला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल याबाबत म्हणाले, “हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती व राजकीय अजेंड्याने प्रेरित आहे”. तसेच, “भारताविरोधात खोट्या तथ्यांवर आधारित अहवाल जारी करण्यापेक्षा अमेरिकेने त्यांच्या देशातील मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं”, असा सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला दिला आहे.

यूएससीआयआरएफने सादर केलेल्या अहवालात भारताबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी रणधीर जयस्वाल यांना प्रश्न विचारले. त्यावर जयस्वाल म्हणाले, “यूएससीआयआरएफच्या अहवालावर आमचं एक ठाम मत आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही एक पक्षपाती संस्था आहे. भारताविरुद्ध चुकीची माहिती पसरवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा अहवाल ठामपणे नाकारत आहोत. दुर्दैवाने हा अहवाल यूएससीआयआरएफच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे”.

आमच्या गोष्टींत ढवळाढवळ करण्यापेक्षा तुमच्या देशातील मानवाधिकाराशी संबंधित समस्या सोडवा : भारत

रणधीर जयस्वाल म्हणाले, यूएससीआयआरएफ असे प्रयत्न वारंवार करत आहे. यामुळे या संस्थेचीच बदनामी होत आहे. अमेरिकेच्या या आयोगाने भारताच्या कारभारात ढवळाढवळ करण्याऐवजी त्यांच्या देशातील मानवाधिकारांशी संबंधित समस्या सोडवायला हव्यात.

हे ही वाचा >> मोठी बातमी : मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा वापरा; भारताचा अमेरिकेला सल्ला

भारताने या अहवालावर म्हटलं आहे की “यूएससीआयआरएफसारख्या संथ्यांनी अमेरिकेत काय चाललंय ते आधी पाहावं. त्यांच्या देशात मानवाधिकारांसंबंधीच्या स्थितींकडे लक्ष द्यावं. अमेरिकेत अलीकडच्या काही वर्षांमध्ये वर्णभेद, वांशिक भेदभावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून होणारा भेदभाव, सामाजिक व आर्थिक असमानतेशी संबंधित अनेक समस्या उद्भवल्या आहेत. अशा स्थितीत यूएससीआयआरएफने इतर देशांविरुद्ध पक्षपाती अहवाल तयार करण्यावर नव्हे तर स्वतःच्या देशातील समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावं, त्यावर आपली ऊर्जा खर्च करावी”.

हे ही वाचा >> ५६ वर्षांनी सैनिकाच्या मृतदेहाचे अवशेष अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात, खिशातल्या ‘त्या’ कागदामुळे ओळख पटली

यूएससीआयआरएफने त्यांच्या अहवालाद्वारे आरोप केला आहे की, भारतात धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन होत आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतातील स्थिती चिंताजनक आहे. मात्र भारताने प्रत्येक वेळी अशा प्रकारचे अहवाल फेटाळले आहे, त्याद्वारे केलेल्या आरोपांचं खंडण केलं आहे.