जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोहिम चालवणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना आता रोबोट्सचे पाठबळ मिळणार आहे. ज्यामुळे लष्काराची ताकद अनेक पटीने वाढणार आहे.
दहशतवाद्यांविरोधात लढताना अनेकदा जवानांना मृत्यूचा सामना करावा लागतो. या लढाईत आजवर अनेक जवान शहीद झाले आहेत. ही देशासमोरची एक चिंतेची बाब असल्याने आता त्यावर रोबोट्सचा उपाय शोधण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराला रोबोटची बहुमुल्य मदत मिळणार आहे. रोबोट्स हे एक यंत्र असल्याने त्याला गोळीबार आणि स्फोटांची काळजी असणार नाही. यामुळे मनुष्यहानी टाळता येणार आहे. त्याचबरोबर हे रोबोट्स युद्ध आणि हल्ल्यांच्या वेळी संवेदनशील ठिकाणी लष्कराला हत्यारे आणि दारूगोळा पुरवणार आहे. फाररिंग रेंजमध्ये असल्याने जवानांना अशा ठिकाणी दारूगोळा घेऊन जाताना जीवाला धोका असतो. मात्र, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने चालणारे हे रोबोट्स सहज लष्कराला मदत करु शकतात. विशेष म्हणजे असे रोबोट्स हे देशातच बनवले जाणार आहेत. भारतीय लष्काने अश प्रकारच्या ५४४ रोबोट्सची मागणी संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. लष्कराच्या या मागणीला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला असून या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. लष्काराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील गावे आणि जंगलांनंतर आता शहरांमध्येही हातपाय पसरायला लागले आहेत. यासाठी लष्काराला आता आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. हलक्या आणि मजबूत रोबोट्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपर्क यंत्रणेची सुविधा असणार आहे. हे रोबोट्स आपल्या मुख्य केंद्रापासून २०० मीटरच्या रेंजमध्ये काम करु शकणार आहेत. ही यंत्रे अशी असायला हवीत जी अवघड ठिकाणीही ग्रेनेड आणि हत्यारांचा पुरवठा करू शकेल असे लष्काराने आपल्या यादीमध्ये म्हटले आहे.
या अत्याधुनिक रोबोट्सचा खास करून राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना उपयोग होणार आहे. कारण राष्ट्रीय रायफल्स हे दहशतवाद्यांचा संहार करण्यासाठीचा एक आधुनिक पद्धतीचे दहशतवादीविरोधी पथक आहे.