गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमी दूर करण्यासाठी आता रेल्वे विभागाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभाग जवळपास २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, यासाठी काही अटी शर्तीदेखील लागू करण्यात आल्या आहेत.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे पात्र कर्मचाऱ्यांनाच पुन्हा कामावर घेणार आहे. गेल्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांची कमी जाणवू लागली आहे. विद्यमान कर्माचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या भरतीप्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी झोन प्रमुखांकडे देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत ट्रकमॅनपासून ते सुपवाझर पदांपर्यंत अशी सर्वच पदं भरली जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांविरोधात निवृत्त होण्याच्या आधीच्या पाच वर्षांत अनुशासनात्मक कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना २ ते ५ वर्षांपर्यंत कामावर घेतलं जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्चमाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेला शेवटचा पगार वेतन म्हणून दिला जाणार आहे. तसेच प्रवास खर्च आणि इतर भत्तेही दिले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिले जाते, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून निवृत्त वेतनाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वेतन म्हणून दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणतीही पगारवाढ दिली जाणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.