IRCTC Indian Railways Ticket Booking New Rule : भारतात रेल्वे प्रवाशांची संख्या अफाट आहे. हे प्रवासी कधीही कुठेही जाताना अनेक महिने अगोदर तिकीट बूक करतात. तिकीट बूक करण्यासाठीची ऑनलाइन व्हिंडो ओपन होण्याची आतुरतेने वाट बघत असतात. भारतीय रेल्वेमध्ये १२० दिवस आधी तिकीट बूक करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम आता बदलण्यात आला आहे. आता तुम्ही केवळ ६० दिवस आधी रेल्वेचं तिकीट आरक्षित करू शकतात. रेल्वेमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना गुरुवारी (१७ ऑक्टोबर) जारी केली आहे. त्यानुसार आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (प्रवासाचा दिवस वगळता) करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार आता १२० दिवस नव्हे केवळ ६० दिवस आधी रेल्वेचं तिकीट आरक्षित करता येईल. भारतीय रेल्वेने एआरपी म्हणजेच अ‍ॅडव्हान्स्ड रिझर्व्हेशन पीरियड दोन महिन्यांनी कमी केला आहे. रेल्वेचा नवीन नियम येत्या १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. हा नवा नियम भारतीय नागरिकांसह परदेशी प्रवाशांनाही लागू होणार आहे. याचाच अर्थ भारतातील पर्यटकही ६० दिवस आधी तिकीट आरक्षित करू शकतील. यासह ज्या रेल्वे गाड्यांचा एआरपी आधीच कमी आहे. त्यावर नव्या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही. यामध्ये गोमती एक्सप्रेस व ताज एक्सप्रेससारख्या गाड्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बऱ्याचदा गाड्या रद्द झाल्यास किंवा चार महिन्यांमध्ये प्रवाशांची फिरण्याची योजना रद्द झाल्यास प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तिकीटाचे पैसे मिळवण्यात अडचणी येतात. त्यामुळे या एआरपीच्या नियमात बदल करण्यात आला असल्याचं रेल्वेतील सूत्रांनी सांगितलं.

रेल्वेने नियम का बदलला?

लोकांचं प्रवासाचं नियोजन सोपं व्हावं, लेकांना रेल्वेचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन मिळावं, त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, तिकीट रद्द करण्याचं प्रमाण कमी व्हावं यांसारख्या अनेक कारणांमुळे या नियमांत बदल करण्यात आला आहे. तसेच तिकीट आरक्षणाचा कालावधी कमी करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने प्रवासी संघटनांकडून व सामान्य प्रवाशांकडून होत होती. त्या मागणीचा सारासार विचार करून आता रेल्वेने आपल्या नियमामध्ये बदल केला आहे.