गाझा, जेरुसलेम : इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धामध्ये तह आणि ओलिसांची सुटका होण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. ‘हमासच्या ताब्यातील ओलिसांच्या बाबतीत चांगली बातमी मिळण्याची आशा आहे’, अशा शब्दांमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी यासंबंधीचे संकेत दिले. तर हमासचा मुख्य इस्माईल हनैया याने सांगितले की, इस्रायलबरोबर तहाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही पक्षांदरम्यान होणाऱ्या या करारानुसार हमास ओलिसांची सुटका करेल आणि त्या बदल्यात इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. गेल्या एका आठवडय़ापासून अमेरिका आणि कतार या समझोत्यासाठी प्रयत्नशील होते.

हेही वाचा >>> मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर ए तैयबाविरोधात इस्रायल आक्रमक, उचललं मोठं पाऊल

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा युद्धकालीन मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्यापूर्वी नेतान्याहू यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. त्यामुळे आता हमासबरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळून हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका आणि ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये विरामाची घोषणा लवकरच होईल अशी आशा आहे. युद्ध सुरू झाल्यापासून शांततेसाठी आतापर्यंत मिळालेले हे सर्वात सकारात्मक संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

युद्धामध्ये आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त सामान्य पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये साडेपाच हजारांपेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. त्याशिवाय इस्रायलच्या सततच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीतील सर्वसामान्यांपर्यंत मदत सामग्री पोहोचवण्यासाठी युद्धामध्ये तात्पुरता विराम घेण्यात यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. मात्र, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्ध थांबवणार नाही अशी भूमिका इस्रायलने घेतली होती. अशा वेळी, नेतान्याहू आणि हनैया यांच्यामध्ये तह आणि ओलिसांची सुटका यासाठी समझोता अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आले.

चीनचे युद्धविरामाचे आवाहन

बीजिंग : इस्रायल आणि हमासने युद्धविराम घ्यावा, सर्व कैद नागरिकांची सुटका केली जावी आणि या भागात दीर्घकालीन शांतता नांदण्यासाठी द्विराष्ट्र सिद्धांताची अंमलबजावणी केली जावी असे आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी मंगळवारी केले.

भारताची भूमिका

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली की, दहशतवादाशी कधीही तडजोड करू नये, दुसरा मुद्दा गाझामधील संकटाचा आहे. तेथे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन केले पाहिजे. तिसरा मुद्दा पॅलेस्टिनी नागरिकांचा हक्क आणि भवितव्याशी संबंधित आहे. संबंधित दोन राष्ट्रांना मान्य असलेल्या मार्गाद्वारेच यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.

अमेरिकेकडून काय माहिती मिळाली?

अमेरिकी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, की इस्रायल आणि हमासदरम्यानच्या या करारानुसार, हमास ओलिसांमधील ५० महिला आणि मुलांची सुटका करेल आणि त्या बदल्यात पॅलेस्टाईनच्या १५० कैद्यांची सुटका केली जाईल. हा विराम चार ते पाच दिवसांचा असेल. मात्र, या कराराला अंतिम स्वरूप मिळालेले नाही अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. 

आम्ही प्रगती करत आहोत. यावेळी यापेक्षा जास्त काही सांगणे योग्य होणार नाही, पण चांगली बातमी लवकरच मिळेल अशी मला आशा वाटते. – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war israel s netanyahu positive over hostage talks with hamas zws