वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम
इस्रायल आणि गाझादरम्यान २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळण्याचे प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दोषारोप केला.
युद्ध पुन्हा सुरू होणे विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अधिकारी व्होल्कर टर्क यांनी व्यक्त केली आहे. तर, इस्रायलने आंतरराष्ट्रीय युद्ध कायद्यांचे पालन करावे आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करू नये असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले. गाझामधील परिस्थिती संकटापेक्षाही अधिक भयंकर आहे कारण पुन्हा युद्ध सुरू झाल्यामुळे आणखी पॅलेस्टिनींचा मारले जाण्याची किंवा जबरदस्तीने विस्थापित होण्याचा धोका आहे असे टर्क म्हणाले.
हमासने शस्त्रविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने केला. तर अधिक ओलिसांची सुटका करण्याचा आपला प्रस्ताव इस्रायलने नाकारला असे उत्तर हमासकडून देण्यात आले. दरम्यान, इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केल्याबद्दल कतारने खेद व्यक्त केला आणि पुन्हा शस्त्रविराम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कतारच्या मध्यस्थीने आणि इजिप्त व अमेरिकेच्या समन्वयाने गेल्या आठवडय़ात शस्त्रविरामावर सहमती होण्यावर यश मिळाले होते.अजूनही २,८०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कोणत्याही आरोपाविना इस्रायलच्या ताब्यात आहेत असा आरोप इस्रायलमधील मानवाधिकार संघटनेने केला आहे.
हेही वाचा >>>मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलली, निवडणूक आयोगानं दिलं ‘हे’ कारण
सर्वात आधी चार दिवसांचा शस्त्रविराम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्याला दोन दिवस आणि नंतर एक दिवस अशी एकूण तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढ पुढेही सुरू ठेवावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव टाकला जात होता. मात्र, त्याला यश आले नाही.
इस्रायलने शुक्रवारी मुख्यत: दक्षिण गाझाला लक्ष्य केले. उत्तर गाझामधील अनेक जणांनी या भागात स्थलांतर केले आहे. मात्र, आता तिथेही इस्रायलकडून पत्रके टाकून लोकांना निघून जाण्यास सांगण्यात आल्याचे स्थानिक पॅलेस्टिनींनी सांगितले. युद्धकाळात २३ लाख रहिवाशांपैकी ७५ टक्क्यांहून जास्त पॅलेस्टिनी स्थलांतरित झाले. तसेच १३ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोनतृतीयांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
जवळपास ३४० जणांची सुटका..
एक आठवडय़ाच्या शस्त्रविरामाच्या काळात हमासने १०० पेक्षा जास्त ओलिसांची सुटका केली. त्यामध्ये प्रामुख्याने महिला, मुले आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हमासच्या ताब्यात सुमारे १२५ जण अद्याप ओलीस आहेत अशी माहिती इस्रायलने दिली. या कालावधीत इस्रायलने सुमारे २४० पॅलेस्टिनी किशोरवयीन मुले आणि तरुणांची सुटका केली. यापैकी बहुतांश जणांना इस्रायली फौजांवर दगडफेक केल्याचा आणि फायरबॉम्ब फेकल्याचा आरोप होता.
हेही वाचा >>>हवाई दलाच्या महासंचालकपदाची धुरा मराठी माणसाच्या हाती; एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार
पॅलेस्टाईनप्रश्नी कायमस्वरूपी तोडग्याचे आवाहन
दुबई : दुबईत सुरू असलेल्या सीओपी२८ परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे अध्यक्ष आयझ्ॉक हझरेग यांची भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पॅलेस्टाईन प्रश्नावर चर्चा व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून लवकर आणि टिकाऊ तोडगा काढण्याचे आवाहन केले. यावेळी मोदी यांनी हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.