Italian PM Meloni Post For PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीचे निकाल, भाजपाच्या गटात विजयी होऊनही ४०० पार न झाल्याचं दुःख, विरोधक गटात आपणच ‘बॉस’ आहोत हे सिद्ध करण्यासाठी दोन पाऊलं पुढे गेल्याचा आनंद अशा घडामोडींसह दोन महिन्यांपासून चालू असलेलं निवडणूक पर्व संपुष्टात आलं. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक संख्याबळ हे एकट्या भाजपाकडे नसलं तरी घटक पक्षांच्या बळावर मोदी एनडीए सरकार स्थापना करू शकतात. मोदींचा हा विजय भारतात किंबहुना भाजपाकडून सुद्धा फार उत्साहाने साजरा होताना दिसत नसला तरी पंतप्रधानांसाठी थेट इटलीतून शुभेच्छा आल्या आहेत.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांना एकत्र आणणारी मैत्री अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र काम करतील याची त्यांना खात्री आहे असं लिहून एक खास पोस्ट मेलोनी यांनी केली आहे. इटलीच्या पंतप्रधान पुढे लिहितात की दोन्ही राष्ट्रे विविध मुद्द्यांवर सहकार्यभावना बाळगण्यासाठी बांधील असतील व दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्वकाही करतील. शेवटी आपल्या राष्ट्राचं व लोकांचं हित हाच आपला हेतू आहे.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची मोदींसाठी खास पोस्ट

दरम्यान, इतर जागतिक नेत्यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंदा, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरीशियाचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली.

मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालांसह भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्रात सलग तिसरे सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला २९१ जागा, इंडिया आघाडीला २३४ जागा आणि इतरपक्षांना १८ जागा जिंकण्यात यश आलं आहे. एनडीएला दणदणीत विजय मिळवून देणाऱ्या एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा लोकसभेची लढत खूपच चुरशीची ठरली.

हे ही वाचा << नरेंद्र मोदी निकालाचे आकडे पाहून म्हणतायत ‘मेनू विदा करो’? Video पाहून व्हाल लोटपोट, मोदींच्या आवाजावर मीमकरी फिदा

संध्याकाळी निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचे सांगतना हा ‘सबका साथ सबका विकास’च्या विकसित भारताच्या संकल्पाचा विजय आहे, असेही म्हटले. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पंतप्रधान मोदी म्हणाले की, १९६२ नंतर पहिल्यांदाच दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सरकारला सलग तिसरा विजय मिळाला आहे. सहा दशकांनंतर ‘नवा इतिहास’ रचल्याचे ते म्हणाले.