S. Jaishankar On Deportation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. अशात काल अमेरिकेने अवैधपणे त्यांच्या देशात प्रवेश केलेल्या १०४ भारतीयांना मायदेशी पाठवले आहे. या दरम्यान भारतीय नागरिकांशी अमेरिकेने गैरव्यवहार करत त्यांना बेड्या ठोकल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास…

राज्यसभेत एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत पाठवण्यात आले आहे. अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी त्यांना यापूर्वी झालेल्या अशा कारवाईची आकडेवारीही सांगितली. ते म्हणाले की, “२०१२ पासून, अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येत आहे. ही कारवाई करत असत्याना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात. टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात.”

अमेरिकन सरकारशी चर्चा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, “अमेरिकेकडून होणारे हद्दपारीचे आयोजन आणि अंमलबजावणी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट प्राधिकरणाद्वारे केली जाते. २०१२ पासून लागू असलेल्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटद्वारे वापरल्या जाणाऱ्या विमानाद्वारे हद्दपारीची प्रक्रिया पार पाडली जाते. याच्या नियमांमध्ये काही तरतूदी आहेत. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट प्राधिकरणाकडून आम्हाला कळविण्यात आले आहे की, महिला आणि मुलांना हद्दपार करताना प्रतिबंधित कले जात नाही.”

राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “परत येणाऱ्या निर्वासितांना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागू नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत.” जयशंकर पुढे म्हणाले की, “जर नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे.”

१०४ भारतीयांना अमेरिकेने माघारी पाठवले

बुधवारी, अमेरिकेत राहणाऱ्या १०४ अवैध भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.