जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. कठुआ जिल्ह्यात २३ मार्च रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कठुआ जिल्ह्यात गुरुवारी (२७ मार्च) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत ३ जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले. तसेच या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.

जुठाना येथील एका घनदाट जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. याचवेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. याबाबत एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनास्थळी अधिक फोर्स पाठवण्यात आलं असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलं आहे.

दहशतवादविरोधी कारवाईत सामील झालेल्या लष्कराचे विशेष दलाने जुठाणा येथे कारवाई केली. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात हे कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी पोहोचले होते. दरम्यान, गुरुवारी झालेल्या चकमकीत सहभागी असलेले दहशतवादी हेच गट होते, जे रविवारी हिरानगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, कठुआ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या नव्या चकमकीत ३ जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आलं आहे.

याआधी हिरानगर सेक्टर भागात झाली होती चकमक

कठुआ जिल्ह्यात रविवारी २३ मार्च रोजी कठुआतील हिरानगर सेक्टर परिसरातील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सान्याल गावात संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरु केली होती. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली होती. सीआरपीएफच्या जवानांनी कठुआतील हिरानगर सेक्टर परिसरात मोठी शोध मोहिम राबवली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबाराला सुरक्षा दलांच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.