Gulmarg Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवांनासह लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केलं. या हल्ल्यामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तसेच लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाला. तसेच या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

हेही वाचा : भारतावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंची खूर्ची धोक्यात; स्वपक्षाकडून राजीनाम्यासाठी दबाव

काश्मीरमधील गुलमर्ग सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची माहिती पोलिसांकडूनही देण्यात आली आहे. बुटा पाथरी सेक्टरमध्ये नागिन पोस्टच्या आसपास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. दरम्यान, एका आठवड्यातील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

‘दहशतवादी हल्ले हा गंभीर चिंतेचा विषय’

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “उत्तर काश्मीरमधील बुटा पाथरी भागात लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी, ज्यात काही हताहत आणि जखमी झाले आहेत. काश्मीरमधील अलीकडच्या काळात होत असलेले हे हल्ले हा गंभीर चिंतेचा विषय आहे. मी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करतो आणि ज्या लोकांचे प्राण गमावले त्यांच्या प्रियजनांना माझ्या संवेदना व्यक्त करतो”, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

गांदरबलमध्ये काही दिवसांपूर्वी झाला होता दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सात कामगारांना जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एका डॉक्टराचाही सहभाग होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. हे कामगार बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. काम करत असतानाच हा हल्ला होता.

अमित शाह यांनी दिला होता कारवाईचा इशारा

काही दिवसांपूर्वी गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी काही स्थलांतरित कामगारांवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी कडक कारवाईचा इशारा होता. अमित शाह यांनी म्हटलं होतं की, “जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गंगानगीरमध्ये नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं.